मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काल पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर राऊत यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच पुन्हा एकदा राऊत यांना त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असंही उद्धव यांनी म्हटलं आहे.

‘संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेतच पण त्यासोबतच ते माझे जवळचे मित्रही आहेत. तुरुंगातील काळ त्यांच्यासाठी जसा खडतर होता, तसा तो आमच्यासाठीही होता. कारण आम्ही एकाच कुटुंबातील आहोत. संकटकाळत ते फक्त आमच्यासोबत उभे राहिले नाहीत, तर सोबत राहून ते लढतही आहेत. त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. यापुढेही आणखी एखाद्या प्रकरणात गोवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो,’ अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Sanjay Raut: फडणवीसांकडून पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत,संजय राऊतांच्या वक्तव्यावर म्हणाले…

‘केंद्रीय यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं की त्याच्या अंगावर जात आहे. केंद्रीय यंत्रणांची ही स्थिती असताना न्यायव्यवस्थेलाही अंकित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय कायदामंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यातून याचेच संकेत मिळत आहेत. देशातील लोकांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केंद्रीय यंत्रणा कारवाई करताना चुकीचं काम करणाऱ्या कोणालाच सोडणार नाहीत, अशा आशयाचं एक ट्वीट केलं होतं. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. ‘फडणवीस यांनी असं ट्वीट केलं असेल तर कोणालाच सोडणार नाहीत, यामध्ये ते स्वत:ही येतात. दिवस नेहमी बदलत असतात. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस यामध्ये फरक असतो, हेच फक्त फडणवीसांनी लक्षात ठेवावं,’ असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here