ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारतानं दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडनं १६ षटकांत एकही विकेट न गमावता पार केलं. जोस बटलर आणि ऍलेक्स हेल्स या इंग्लंडच्या सलामीवीरांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारतीय गोलंदांजांची धुलाई केली. भारतीय गोलंदाज आज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यामुळे भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

भारतीय संघाची गट साखळीतील कामगिरी उत्तम होती. पाचपैकी चार सामने जिंकत भारतानं उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या गटात भारत अव्वल स्थानी होता. मात्र उपांत्य फेरीत इंग्लंडनं भारताचा दारुण केला. या पराभवामुळे भारतीय संघात येत्या काही दिवसांत बरेच बदल दिसू शकतात. हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्त्व जाऊ शकतं, अशी शक्यता दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी बोलून दाखवली.
विराट होणं सोपं नाही! ३ वर्ल्डकपमध्ये कोणालाच न जमलेली कामगिरी केली; पण पदरी केवळ निराशा पडली
गेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सनं जेतेपद पटकावलं. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची ती पहिलीच आयपीएल स्पर्धा होती. पहिल्याच संधीचं हार्दिकनं सोनं केलं. त्यामुळे त्याच्याकडे पुढील कर्णधार म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्याला कर्णधार होण्याची निश्चित संधी आहे, असं गावसकर म्हणाले.

संघात अनेक बदल होऊ शकतात. काही जण निवृत्ती स्वीकारू शकतात. संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांचं वय ३५ च्या आसपास आहे. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्या संघातील स्थानाचा पुर्नविचार होऊ शकतो, असं गावसकर म्हणाले. इंग्लंडविरुद्ध झालेला मोठा पराभव पाहता भारताच्या टी-२० संघात बरेच बदल दिसण्याची शक्यता आहे.
भारताचा मानहानिकारक पराभव, मात्र अ‍ॅडलेडवरचा काळा इतिहास पुसून टाकला
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला पॉवरप्लेचा लाभ उठवता आला नाही. सलामीवीर राहुल आणि रोहित शर्मा फ्लॉप ठरले. विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतकी खेळी केल्यानं संघाचा डाव सावरला. त्यामुळे संघाला १६८ धावा करता आल्या. गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना वेसण घालून विकेट्स काढणं अपेक्षित होतं. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही विकेट काढता आली नाही. त्यामुळे दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here