मुंबईतील युद्धनौका दुरुस्तीला यूव्ही किरणांच्या स्वच्छतेचे कवच मिळाले आहे. कुलाब्यातील नौदल गोदीत येणाऱ्या सर्व सामानांचे निर्जंतुकीकरण याच अल्ट्रा व्हॉयलेट (यूव्ही) किरणांच्या आधारे होत आहे. याआधारे नौदल गोदीतील काम २० ते २५ टक्के कर्मचाऱ्यांसह नव्या उमेदीने सुरू झाले आहे.
करोना संकट व लॉकडाऊन काळात नौदल गोदीतील नौकादुरुस्ती जवळपास ठप्प होती. फक्त अत्यावश्यक दुरुस्ती केली जात होती. परंतु, नौदलाच्या दोन विनाशिका व काही फ्रिगेट्सची दुरुस्ती लवकर होणे गरजेचे आहे. यासाठीच ‘पुनश्च हरिओम’दरम्यान नौदल गोदीत महत्त्वाच्या कामांना जोमाने सुरुवात झाली आहे. त्यासाठी नागरी कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवरच यूव्ही किरणांच्या निर्जंतुकीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.संरक्षण जनसंपर्क अधिकारी कमांडर मेहुल कर्णिक यांनी सांगितले की, ‘नौदल गोदीत युद्धनौकांची दुरुस्ती होत असल्याने विविध प्रकारची सामग्रीची गरज असते. या सामग्रीच्या माध्यमातून करोना पसरू नये यासाठी, सुरक्षेचे उपाय करण्यात आले आहेत. याअंतर्गत दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोषाखासह सर्व प्रकारच्या दुरुस्ती सामग्रीचे अल्ट्रा व्हॉयलेट किरणांद्वारे निर्जंतुकीकरण होत आहे. यासाठी साधारण पाच ते दहा मिनिटांचा कालवधी लागतो. परंतु, याद्वारे १०० टक्के निर्जंतुकीकरण होत असून, गोदीतील अत्यावश्यक काम जोमान सुरू झाले आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times