विदर्भाला आत्महत्यांचा जणू काही शापच लागलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ही संख्या सातत्याने वाढत असून अमरावती विभागात २०१७ ते मे २०२० दरम्यान एकूण ३ हजार ५५८ शेतकऱ्यांनी केली आहे. त्यातील १ हजार ७१८ जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून, अद्याप १९० प्रकरणे प्रलंबित आहेत.
बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाच्या व्याजाच्या रकमेची थकबाकी दाखवल्याने नवे कर्ज मिळताना नाकीनऊ येत आहेत. शेतकरी विम्याचा लाभ होत नाही. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, शेतमालाचा अपुरा दर, बँकांकडून होणाऱ्या कृषी पतपुरवठ्यातील अडचणी, अशा विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. यवतमाळ जिल्हा तर शेतकरी आत्महत्यांसाठी सर्वत्र ओळाखला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी अमरावती विभागात २०१७ ते मे २०२० दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्या, त्यांना मिळालेली आर्थिक मदत आदींबाबत माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला. त्या अर्जावर अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या उत्तरानुसार, २०१७ मध्ये १०६६, २०१८- १०४९, २०१९-१०५६, तर २०२० मधील मे महिन्यापर्यंत ३८७ शेतकरी आत्महत्या झाल्या. यातील १ हजार ६१८ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरलीत. पात्र प्रकरणे १ हजार ७५० आहेत.
सर्वाधिक आत्महत्या बुलडाण्यात
अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम यांचा समावेश होतो. यातील बुलडाण्यात सर्वाधिक १०११ आत्महत्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ – ८८५, अमरावती – ८८३, अकोला – ४८७ आणि वाशीम – २९२ यांचा क्रमांक आहे. तर सर्वाधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणाऱ्या शहरात अमरावतीचा क्रमांक पहिला आहे. अमरावती – ५४४, बुलडाणा – ४२८, अकोला – ३२४, यवतमाळ – २७५ आणि वाशीम – १४७ जणांना मदत मिळाली आहे. मदतीसाठी केलेल्या अर्जांपैकी प्रलंबित अर्जांची संख्या शहरनिहाय अमरावती – ४८, अकोला – ३०, यवतमाळ – ३५, बुलडाणा – ४० आणि वाशीम – २६ अशी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times