मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवकालीन इतिहासावर आधारित चित्रपटांवरून वादंग सुरू आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात या चित्रपटाचा सुरू असलेला शो बंद केला. त्यानंतर आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटकेची कारवाईही केली होती. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानेही आपली भूमिका जाहीर केली असून सामना या मुखपत्रातून आक्रमकपणे चित्रपटाशी संबंधित व्यक्तींचा समाचार घेण्यात आला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका. पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील,’ असा हल्लाबोल ‘सामना’तून करण्यात आला आहे.

Jitnedra Awhad: राजीनाम्याच्या घोषणेपूर्वी जितेंद्र आव्हाडांचं ट्विट, एकनाथ शिंदेंना सावधानतेचा इशारा

धर्मवीर चित्रपटावरूनही ‘सामना’तून टीकास्त्र

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरूनही सामनात टीका करण्यात आली आहे. ‘हर हर महादेव नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर केली गेली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला. असे अनेक प्रसंग चित्रपटात असून ते इतिहासाशी विसंगत आहेत. ‘पावनखिंड’ नामक एक चित्रपट मधल्या काळात आला व गेला. त्यावरही आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे पडद्यावर तसेच रंगमंचावर ऐतिहासिक नाटय़ आणणाऱ्यांसमोर मोठाच यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही. राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड गल्लाभरू चित्रपटांसाठी केली जाऊ नये,’ अशी अपेक्षा ‘सामना’तून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here