धोनीची भूमिका काय असणार?
टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१ मध्ये धोनी भारताचा मेंटॉर होता. मात्र त्यावेळी त्याची भूमिका केवळ एका स्पर्धेशी संबंधित होती. त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसला नाही. आता यावेळी धोनीला अधिक मोठी जबाबदारी देण्याचा विचार सुरू आहे. आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू धोनीच आहे. इतर कोणत्याच कर्णधाराला हा पराक्रम जमलेला नाही. आयसीसीच्या स्पर्धा, त्यावेळी येणारा दबाव, जुन्या-नव्यांची सांगड, वर्कलोड व्यवस्थापन यांचा खूप मोठा अनुभव धोनीच्या गाठीशी आहे. त्याचा फायदा टीम इंडियाला मिळावा यादृष्टीनं बीसीसीआय विचार करत आहे.
एम एस धोनी आयपीएल २०२३ नंतर आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे बराच वेळ असेल. त्यामुळे त्याच्याकडे टीम इंडियाच्या टी-२० संघाला हाताळण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडला तिन्ही प्रकारात एकाचवेळी काम करणं अवघड जात आहे.
बीसीसीआय लगेच मोठे बदल करणार?
टीम इंडियाच्या टी-२० विश्वचषकातील पराभवाला अद्याप आठवडादेखील झालेला नाही. मात्र बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा पवित्रा बीसीसीआयनं घेतला आहे. पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. मात्र त्याआधी २०२३ मध्ये एकदिवसीय स्पर्धा होईल.