मुंबई : मुंबईत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, २६ ऑक्टोबरपासून शहरात १४२ रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत सात बालकांचा संशयित मृत्यू झाला आहे. मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर या बालकांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असले तरी महापालिका व राज्य सरकारने गोवर संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन पावले उचलली आहेत. मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले.

मुंबईतील आठ विभागांतील झोपडपट्ट्यांमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यातील सर्वाधिक ५० रुग्ण गोवंडीमध्ये आहेत. त्याखालोखाल कुर्ला विभागात ३१ रुग्ण आढळले आहेत. तसेच २६ ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत मुंबईमध्ये सात बालकांचा गोवरने मृत्यू झाल्याचा संशय आहे. हे संशयित मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात चार, राजावाडी रुग्णालयात दोन आणि एका बालकाचा घरी मृत्यू झाला आहे. पालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, लक्षणे आढळणाऱ्या मुलांना ‘व्हिटॅमिन ए’चे दोन डोस देण्यात आले आहेत. तसेच ज्या मुलांमध्ये लक्षणांची तीव्रता अधिक आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. तर मुंबईतील आठ विभागांमध्ये गोवरच्या साथीच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

राज्य नाट्य स्पर्धा : पहिल्याच दिवशी सावरकरप्रेमींचा गोंधळ, नथुराम समर्थनाच्या घोषणा, ते नाटक पाडले बंद
गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कस्तुरबा रुग्णालयामध्ये तीन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ८३ खाटा, दहा आयसीयू खाटा आणि पाच व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गोवंडी, मानखुर्द, कुर्ला भागातील रुग्णसंख्या पाहता गोवंडी शताब्दी रुग्णालयात दहा खाटा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच गोवंडीतील मॅटर्निटी होममध्येही रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्याबरोरच आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले

दुसरीकडे राज्य सरकारनेही या प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी महापालिका प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणती खबरदारी घेतली जात आहे, त्याची माहिती घेतली. रुग्णालयांत सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावी, संसर्ग फैलवणार नाही याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी चहल यांना सांगितले. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे तसेच रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करून गोवरबाबत आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.

गोवरचा संसर्ग

प्रभाग – रुग्ण

ई प्रभाग(भायखळा) ६

एम/ई (गोवंडी) ४५

एम/डब्ल्यू (चेंबूर) ७

एच/ई (सांताक्रूझ) १२

एल (कुर्ला) ३१

पी/एन (मालाड) १५

एफ/एन (माटुंगा) १३

जी (दादर) ७

गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार ते रामदास कदम, मातोश्रीवर टीका करणाऱ्या नेत्यांना अंधारेंनी सुनावलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here