Maharashtra Political crisis | एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा आहे. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्त्वाच्या विचाराने चालणारी, आक्रमक आणि मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी काम करणारी आहे. मी त्याच पक्षात गेलो आहे. यामध्ये निष्ठेचा प्रश्न कुठे येतो? शिंदे गटाकडे ५० आमदार आणि भाजपकडे १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले.

 

Gajanan Kirtikar
गजानन कीर्तिकर

हायलाइट्स:

  • पक्षात अन्याय होत असतानाही मी इतके दिवस गप्प राहिलो
  • मी तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार सहन करत होतो
पुणे: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार गजानन कीर्तिकर सध्या प्रकाशझोतात आले आहेत. पुण्यातील एका पत्रकार परिषदेत त्यांच्याबाबत एक किस्सा घडला. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांचा पारा चांगलाच चढताना दिसला. पक्षात अन्याय होत असतानाही मी इतके दिवस गप्प राहिलो होतो. मी तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार सहन करत होतो. पण मी निष्ठावंत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे किंवा भाजप कुठल्याच पक्षात गेलो नाही. माझ्यावर अन्याय, अपमान होत असतानाही त्याच पक्षात राहिलो. कारण मी निष्ठावंत होतो, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.

यावर एका पत्रकाराने त्यांना प्रतिप्रश्न केला. एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष अस्तित्त्वात येऊन फक्त दोन महिने झाले आहेत. मग तुम्ही ठाकरेंची साथ सोडून या पक्षात गेलात तरी स्वत:ला निष्ठावंत कसे म्हणवता, असा प्रश्न गजानन कीर्तिकर यांना विचारण्यात आला. त्यावर गजानन कीर्तिकर चांगलेच संतापले. तू पत्रकारितेचं शिक्षण घेतलसं का? मी माहिती व प्रसारण मंत्री होतो, मला बऱ्यापैकी माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा आहे. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्त्वाच्या विचाराने चालणारी, आक्रमक आणि मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी काम करणारी आहे. मी त्याच पक्षात गेलो आहे. यामध्ये निष्ठेचा प्रश्न कुठे येतो? शिंदे गटाकडे ५० आमदार आणि भाजपकडे १०६ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. एकनाथ शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती शाबुत ठेवली, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
वडिलांनी साथ सोडली असेल पण माझा उद्धव-आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास, मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहणार: अमोल कीर्तिकर

गजानन कीर्तिकर केंद्रात मंत्री होणार?

गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि गजानन कीर्तिकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या हेतूनेच गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचंही बोललं जात आहे. यासोबत दोन राज्यपाल पदांचीही मागणी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने केली होती. अमित शाह यांनी यापैकी मंत्रिपदांची मागणी मान्य केल्याची माहिती आहे.

२०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याबद्दल गजानन कीर्तिकर यांनी अलीकडेच नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.२०१९ मध्ये एनडीएमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद आले होते. ते मंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना दिले. अशावेळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मर्जीतील माणसे आठवतात. गजानन किर्तीकर यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आठवत नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांना माझं नाव लक्षात आले नाही का, असा सवालही गजानन किर्तीकर यांनी उपस्थित केला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here