मुंबई: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कारणावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ‘भारत जोडो यात्रे’बाबत टोकाचा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.
मोदी शेतकरी कामगारांच्या खिशातून पैसे काढतात आणि दोन-चार उद्योगपतींना देतात: राहुल गांधी
राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. देशातील दलित आणि आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप पक्ष दररोज संविधानावर हल्ला चढवत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा उल्लेख केला. इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासी समाजाचं प्रतिक आहेत, ते तुमच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

भारत जोडो यात्रेत ‘एकजुटीचा मेळा’, दिल्लीहून सोनिया गांधी येणार, पवार-ठाकरेंनाही निमंत्रण

देवेंद्र फडणवीस राहुल गांधींवर संतापले

स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील एकमेव असे नेते आहेत की, त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसच्यावतीने त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचा प्रयत्न होतो. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासारखे काँग्रेसचे नेते रोज स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, निर्लज्जपणे काहीतरी सांगतात. त्यांना महाराष्ट्रातील जनता नक्की उत्तर देईल, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काँग्रेसच्या किंवा स्वातंत्र्यलढ्यातील सर्व नेत्यांविषयी मला प्रचंड आदर आहे. पण माझा सवाल आहे की, अंदमानच्या कोठडीत ११ वर्षे वीर सावरकर यांच्याप्रमाणे अनन्वित अत्याचार सहन करणारा, एकतरी नेता मला दाखवा, असे आव्हान फडणवीसांनी राहुल गांधी यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here