मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी एकीकडे तयारी सुरू असताना त्यांच्याच स्मारकावरून भारतीय जनता पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांत बुधवारी वादाची ठिगणी पडली. ‘हे स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर खासगी, वैयक्तिक बैठकांसाठी, कामांसाठी होऊ नये,’ अशी अपेक्षा भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे मांडली, तर ‘हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे,’ अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली. बाळासाहेबांचे स्मारक राजकीय शक्तिस्थान होणार असल्याने व मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने या मुद्द्यावरून आता वाद वाढत जाईल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या निवासस्थानाची जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निश्चित झालेली आहे. या स्मारकाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

तू भेटली नाही तर जीवाचे बरे वाईट करेन, धमकी द्यायला तिच्या घरी पोहोचला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
‘बाळासाहेबांचे स्मारक हे जनतेसाठीचे स्मारक आहे. स्मारकाच्या समितीत कोण आहे याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. स्मारकाचे काम लवकर झाले पाहिजे, ही आमची इच्छा आहे,’ असे फडणवीस म्हणाले. ‘मी मुख्यमंत्री असताना आम्ही या स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला होता,’ अशी आठवण करून देऊन फडणवीस म्हणाले, ‘आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्मारकाचे काम पूर्ण होईल. जनतेला यातून प्रेरणा मिळावी म्हणून हे स्मारक बनावे. खासगी वा वैयक्तिक बैठकांसाठी या स्मारकाचा वापर होऊ नये. स्मारकाचे कामकाज चालताना नियमांचे पालन व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.’

‘हे स्मारक जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल. त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी नमूद केले. ‘बाळासाहेबांच्या या ऐतिहासिक स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५० टक्के काम झाले आहे. मार्च २०२३च्या आधी स्मारकाचे काम पूर्ण होईल. दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे. यामध्ये ऑडिओ-व्हिडीओ, बाळासाहेबांची भाषणे, व्यंगचित्र यांचा संग्रह असेल. बाळासाहेबांचा राजकीय प्रवासाबाबतचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल,’ असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे,’ अशी मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. ‘बाळासाहेबांचे स्मारक कुठल्या वैयक्तिक कुटुंबाचे किंवा घराण्याचे नाही,’ अशी पुस्ती लाड यांनी जोडली.

स्मृतिस्थळी गोमुत्राचे शिंपण

बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी संध्याकाळनंतर भेट दिली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या स्मृतिस्थळापाशी जमले व त्यांनी तेथे गोमूत्र शिंपडले. हे शुद्धीकरण असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यामुळे अता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Measles outbreak in Mumbai : गोवरचे रुग्ण वाढतेच, १६४ बालकांना संसर्ग; वॉर्ड, व्हेंटिलेटर, आयसीयू खाटांची सोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here