शेगाव : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत फुटीची चिन्हं निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. या सगळ्या वादंगाबाबत आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुलजी गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,’ असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी सावरकरांविषयी सत्यच सांगितलं; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींकडून समर्थन

‘राहुलजी गांधी यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांची सभा उधळून लावू, असा इशारा मनसेनं दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जयराम रमेश म्हणाले की, ‘सावरकारांच्या मुद्दयावरून महाराष्ट्रातील काही पक्ष व संघटना नाहक वातावरण तापवत आहेत. सावरकांच्या बाबतीत जे ऐतिहासिक सत्य आहे ते कसे नाकारता? असा सवाल उपस्थित करून भारत जोड़ो यात्रेचा हा एकच मुद्दा नाही. यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसने इतिहासाची मोडतोड करुन मांडणी केलेली नाही. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकर यांनीच मांडला. १९४२ च्या भारत छोडो, चले जावच्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला होता. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालच्या फाळणीचे कट्टर समर्थक होते व मुस्लीम लिगशी त्यांनी युती करून सरकारही स्थापन केले होते हे ऐतिहासिक सत्य आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड समर्थन मिळत असल्याने काही लोक विरोध करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व भारतयात्रींना चिंता आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेत कसलीही तडजोड केली जाणार नाही.’

दरम्यान, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या १९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत ९० टक्के महिलांचा सहभाग असेल. महिलांचा राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्याचा निर्णय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी घेतला. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देशभर महिलांचे प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. उद्या नारीशक्तीची भव्य दर्शन भारत जोडो यात्रेत दिसेल,’ असं जयराम रमेश यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here