स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. पंडित नेहरू यांच्यावर आरोप करताना सावरकर म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. पंडित नेहरू आणि एडवीना यांच्यातील पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि तो सर्व जाहीर करावा अशी माझी मागणी आहे. ज्यांना आपण चाच नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली हे त्यानंतरच संपूर्ण देशाला कळेल, असेही सावरकर पुढे म्हणाले.
नेहरू यांच्यावर आरोप करताना सावरकर पुढे म्हणाले की, पंडित नेहरू हे ९ मे ते १२ मे १९४७ च्या दरम्यान एकटेच शिमल्याला गेले. तेथे ते कुटुंबासोबत चार दिवस राहिले. त्याबाबत एडवीनाने ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख आढळतो की, मी पंडित नेहरू यांना आपले पाहुणे म्हणून बोलावले. ते अतिशय व्यग्र असल्याने ते ‘नर्व्हस ब्रेक डाऊन’कडे येत आहेत. त्यांनी चार दिवस माझ्यासोबत घालवले. माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली. ही मैत्री खूप मोठा काळ टिकेल. एडवीना यांनी पंडित नेहरू हे माझ्या नियंत्रणात आले आहेत असं सांगितल्याचेही सावरकर म्हणाले.
पंडित नेहरू यांनीच माऊंटबॅटन यांना व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले, असे सावरकर यांनी सांगितले. ते व्हाईसरॉय असल्यानेच पाकिस्तानात सैन्य पाठवू शकत नसल्याचे बलवंत सिंग यांनी सांगितले. भारतातील २० हजार मुलींचे अपहरण होऊन त्या पाकिस्तानात होत्या. माऊंटबॅटन यांनी लिहिलंय की, हत्याकांड पाहून भारतीय नेत्यांना काय करावे हे कळत नव्हते त्यामुळे मी नियंत्रण हातात घेतले. माऊंटबॅटन भारतातून गेल्यावर नेहरू यांनी त्यांना १२ वर्षे दररोज आपला रिपोर्ट पाठवला असे माऊंटबॅटनने लिहिलं आहे. हे गुप्तचर संस्थांचं मोठं अपयश आहे.
नेहरुंना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले- सावरकर
त्यांनी पुढे गंभीर स्वरुपाचा आरोप करताना म्हटले की, नेहरू यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले आणि त्यात ते फसले. हा तर गुन्हा आहे. मागील काही काळात अनेक लोकांना तसे पकडण्यात आले. शिक्षाही झाली. नेहरूंविषयी कोण बोलणार मग? १२ वर्षे झालेल्या हनीट्रॅपवर राहुल गांधींनी उत्तर दिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणीही सावरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.