Maharashtra Politics | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात रोष पसरला होता. महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने केली होती. तर सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही बरीच आगपाखड झाली होती. त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

हायलाइट्स:
- आमचे आजचे हिरो हे शिवाजी महाराज हेच आहेत
- कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही
- कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात रोष पसरला होता. महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने केली होती. तर सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही बरीच आगपाखड झाली होती. त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया देताना राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांचा भक्कमपणे बचाव केला.
या जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हिरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबाबत शंका नाही. मला वाटत नाही की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मनातही याबाबत काही शंका असेल. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता, असे सांगत फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू लावून धरली.
तर दुसरीकडे सुधांशू त्रिवेदी यांच्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी युक्तिवाद केला. या देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही आदर्श असूच शकत नाही. सुधांशू त्रिवेदी यांचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. त्यामध्ये त्रिवेदी यांनी कुठेही,’शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली’, असा उल्लेख केलेला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. देवेंद्र फडणवीस यांचा एकूण सूर पाहता भाजपकडून राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात कोणताही कारवाई होणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?
“आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”
सुधांशू त्रिवेदी नेमकं काय म्हणाले?
राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र आधीच्या काळात अनेक लोक सुटकेसाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला पाच वेळा पत्र लिहिलं होतं. मग त्याचा अर्थ काय होतो? ब्रिटीश संविधानाची शपथ तर नाही घेतली ना, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेच्या कार्यक्रमात बोलताना केले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.