india vs new zealand 3rd t20: न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका भारतानं जिंकली. ही मालिका पावसानं गाजवली. पावसामुळे पहिला टी-२० सामना होऊ शकला नाही. दुसरा सामना भारतानं सूर्यकुमार यादवच्या घणाघाती शतकामुळे सफाईदारपणे जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात पावसामुळे डकवर्थ लुईसचा आधार घ्यावा लागला. मात्र त्यानंतरही सामना टाय झाला आणि भारतानं मालिका १-० अशी जिंकली.

एक चूक अन् न्यूझीलंड पराभूत
पाऊस पडण्याआधीच षटक न्यूझीलंडच्या इश सोधीनं टाकलं. या षटकात सहा धावा निघाल्या. पांड्या आणि हुड्डानं प्रत्येकी तीन एकेरी धावा काढल्या. या षटकाती सहाव्या चेंडूवर खरं तर एकही धाव नव्हती. मात्र बॅकवर्ड पॉईंटला असलेल्या मिशेल सँटनरच्या हातून चेंडू निसटला. त्यामुळे हुड्डानं एक धाव पळून काढली. सँटनरची एक चूक न्यूझीलंडला महागात पडली. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाचा आधार घेण्यात आला. सँटनरनं चेंडू नीट पकडला असता तर भारताची एक धाव कमी झाली असती. अशा परिस्थितीत डकवर्थ लुईसनुसार न्यूझीलंडचा संघ एक धावेनं विजयी झाला असता.
भारतीय गोलंदाजांची सुरेख कामगिरी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंगनं सलामीवीर फिन ऍलनला अवघ्या ३ धावांवर माघारी धाडलं. यानंतर चॅपमन १२ धावा काढून बाद झाला. ग्लेन फिलीप्स आणि कॉनवे यांनी ८६ धावांची भागिदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढलं. ३ बाद १३० अशा सुस्थितीत असलेल्या न्यूझीलंडला मोहम्मद सिराज आणि अर्शदीपनं सातत्यानं धक्के दिले. १६ व्या षटकानंतर ३ बाद १३० अशा स्थितीत असलेला किवींचा डाव १९.४ षटकांत १६० धावांत आटोपला. अर्शदीप आणि सिराजनं प्रत्येकी ४ गडी टिपले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.