पोलिसांनी तात्काळ शंकुतलाबाईंना रुग्णवाहिकेत बसवून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आजीबाईंनी त्यांचं नाव शकुंतलाबाई पळसपगार व गाव फुबगाव असल्याचं सांगितलं. शिरजगांव पोलिसांनी त्याच रात्री त्यांना चांदूर बाजार, अचलपुर रोडस्थित विसावा वृद्धाश्रम शेकापूर जवर्डी (अचलपूर) येथे आणून सोडलं. त्या दिवसापासून विसावा वृद्धाश्रमाचे अॅड. भाष्कर कौतिक्कर, व्यवस्थापक सचिन गणेशराव वानखडे वृद्धाश्रमातील वृद्धांनी शंकुतलाबाईंची सेवा केली. त्यांना ठणठणीत बरं केलं. तेव्हापासुन शकुंकतलाबाई विसावा वृद्धाश्रमात रुळल्या होत्या.
दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा भलामोठा परिवार असूनदेखील शकुंतलाबार्इंना त्यांच्या रक्ताच्याच नातेवाईकांनी आयुष्याच्या संध्याकाळी वाऱ्यावर सोडलं होतं. घरच्यांनी सोडल्यामुळे शकुंतलाबाई मानसिकरित्या खचल्या होत्या. त्यांना त्यांचा मुलांचा व परिवाराचा विरह सहन होत नव्हता. विसावा वृद्धाश्रमातील वृद्धांना त्या नेहमी मी मनोहरच्या (शकुंतलाबाईचा मुलगा) घरी चहा प्यायला जाते म्हणून सांगायच्या.
विसावा वृद्धाश्रमाच्या वतीने व शिरजगांव कसबा पोलिसांच्या वतीने शकुंतलाबार्इंच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. परंतु त्यांचा मुलगा मनोहरनं मी तिचा सांभाळ करणार नसल्याचे पोलिसांना सांगितलं. त्यामुळे विसावा वृद्धाश्रमातच शकुंतलाबार्इंची देखभाल करण्यात येत होती. गेल्या आठ दिवसांपासून शकुंतलाबार्इंची तब्येत खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. त्यातच सोमवार दि. २१ नोव्हेंबरपासून त्या मरणासन्न झाल्या होत्या. केवळ दुधावर असणाऱ्या शकुंतलाबार्इंच्या आजाराचा निरोप शिरजगांव पोलिसांना देण्यात आला. शिरजगांव पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. तरीही कोणीही त्यांना पाहावयास आलं नाही.
इकडे विसावा वृद्धाश्रमात शकुंतलाबाई मनोहर-मनोहर म्हणत मुलाच्या नावाचा जप सुरू केला. मरण्याआधी मुलगा मनोहरला एकदा पाहावं, त्याच्या हातून चहा घ्यावा अशी इच्छा शकुंतलाबार्इंची होती. त्यावेळी विसावा वृद्धाश्रमाचे संस्थापक सचिव अॅड. भाष्कर कौतिक्कर यांनी मीच मनोहर असल्याचं म्हणत शकुंतलाबाईंना थोडा चहा व दूध पाजलं. परंतु मनोहर काही आला नाही. शेवटी मंगळवार दुपारी सव्वा चारच्या दरम्यान शकुंतलाबाईंनीं विसावा वृद्धाश्रमातच शेवटचा श्वास घेत इहलोक सोडला.
शकुंतलाबाईंच्या निधनाने विसावा वृद्धाश्रमावर शोककळा पसरली. वृद्धाश्रमाच्या बाहेर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर मात्र त्यांचा पूर्ण परिवार अंत्यसंस्काराला उपस्थित होता. वृद्धाश्रमातील वृद्धांनी शकुंतलाबाईंवर शेवटचे संस्कार करत त्यांना निरोप दिला. शकुंतलाबार्इंच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी माहेर फाऊंडेशनच्या सदस्या माजी नगरसेविका दिपाली विधळे, अचलपुर येथील राहुल साडी सेंटरचे संचालक राहुल अग्रवाल यांनी सहकार्य केलं. यावेळी वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव ऍड. भाष्कर कौतिक्कर, अध्यक्ष पुंडलिकराव भुजाडे, व्यवस्थापक सचिन गणेशराव वानखडे, जानरावजी कौतिक्कर, माहेर फाऊंडेशनच्या दिपा तायडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.