मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती टीका करत राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेच्या ‘टायमिंग’वरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
‘हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे हे आजच का बोलले? कारण खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रात काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यावर मत मांडावं लागलं. आपल्यासमोर ही घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, हे छत्रपती उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर आज पहिली प्रतिक्रिया आज पवारसाहेबांनी दिली. आता पवारसाहेब बोलल्यावर उद्धव ठाकरे यांना बोलणं क्रमप्राप्तच होतं. पवारसाहेब बोलले की उद्धवजींना बोलावंच लागतं, त्यामुळे ते बोलले असतील,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. Devendra Fadnavis: अमृता एक स्वतंत्र्य व्यक्ती, तिला तिची मतं मांडण्याचा हक्क: फडणवीस
‘या संपूर्ण विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत, आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावर राजकारण करणं योग्य नाही,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करताना उद्धव ठाकरेंनी काय इशारा दिला?
शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आयडॉल आहेत, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटल्यामुळे वादंग निर्माण झालं. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी राज्यभर आंदोलन केलं. तसंच आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ‘जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे येते दोन-चार दिवस आपण वाट पाहू आणि राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.