म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात भवानी पेठ परिसर करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता, मात्र, पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे सध्या रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. हा भवानी पेठे पॅटर्न संपूर्ण शहरात राबवावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पुणे शहरामध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजे आणि सद्याची परिस्थती या संदर्भात मोरे यांनी माहिती दिली.

महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे पुण्यामध्ये करोनाचा प्रसार रोखण्यात अपयश आले आहे. क्वारंटाईन सेंटरमधील रुग्णांना सुविधा मिळत नाही. शिवभोजन थाळी पाच रुपयांना मिळत असताना महापालिकेने यापेक्षा निकृष्ट दर्जाची भ्रष्टाचारी थाळी ७० रुपयांना दिली जात आहे, असा आरोप मोरे यांनी ठाकरे यांच्याकडे केला.

खासगी हॉस्पिटल्सच्या ट्रस्टींनी पुणे महापालिकेकडून ९९ वर्षाच्या करारावर अत्यंत अल्प दरात जागा घेउन हॉस्पिटल्स उभारले आहेत. तेथे ते व्यावसायिक धोरणच राबवत आहेत. हे हॉस्पिटल महापालिका व राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा रूग्ण दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असे गाऱ्हाणे मोरे यांनी मांडले.

पुण्यात आतपर्यंत सर्वाधिक ६१ जणांचा मृत्यू

पुणे शहर जिल्ह्यात रविवारी ६१ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यूची संख्या मानली जात आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला तर जिल्ह्यात मृतांची संख्या १३४७ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात २४५९ रुग्ण आढळल्याने रुग्णांच्या संख्येने ५१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठेआव्हान उभे राहिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here