Maharashtra Poltical crisis | माझा नाशिकचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो नाही. आमच्या कुठेही विसंवाद नाही. आमचं सगळं चांगलं चाललं आहे. तुमच्याकडे कोणीतरी बातम्या पेरत आहे. मी नाराज नाही. कामाख्या देवीला जाण्यासाठी केवळ आजचाच एक दिवस आहे, असे नव्हे. आज नाही गेलो तर मी नंतर कधीतरी जाईन. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखे आहे.

 

Eknath Shinde Abdul Sattar
अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण
  • आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे
नाशिक: शिंदे गटाच्या बहुचर्चित गुवाहाटी दौऱ्याला पाच आमदार आणि एका खासदाराने दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. काल-परवापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासाबोत सर्व ४० आमदार आणि अपक्ष आमदारही जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, कालपासून गुवाहाटीला न जाणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांची नावं एक-एक करून पुढे येऊ लागली. अखेर शिंदे गटाचे सहा नेते गुवाहाटीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, महेंद्र दळवी आणि संजय गायकवाड आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. यापैकी काहीजण नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती. मतदारसंघातील पूर्वनियोजित कामांमुळे आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचे संबंधित आमदारांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची कानउघडणी केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या नाराजीची विशेष चर्चा रंगली होती. (Eknath Shinde camp Guwahati Visit)

मात्र, अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या सर्व शक्यता फेटाळून लावल्या. माझा नाशिकचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो नाही. आमच्या कुठेही विसंवाद नाही. आमचं सगळं चांगलं चाललं आहे. तुमच्याकडे कोणीतरी बातम्या पेरत आहे. मी नाराज नाही. कामाख्या देवीला जाण्यासाठी केवळ आजचाच एक दिवस आहे, असे नव्हे. आज नाही गेलो तर मी नंतर कधीतरी जाईन. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखे आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की, ते दुसऱ्याला हात दाखवणार नाहीत, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

यावेळी अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही भाष्य केले. अनेकदा मंत्रिमडळ विस्तार हा टप्याटप्प्याने होतो. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार केली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडेल, असा दावा सत्तार यांनी केला.

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा, असं मी म्हटलं होतं: अब्दुल सत्तार

मी फार कडवा शिवसैनिक नाही. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत आलो. २५ वर्षे मी काँग्रेस पक्षाचा आमदार होतो. ज्योतिषाला हात दाखवण्याच्या मुद्द्यावरुन शिंदे साहेबांवर टीका होत आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हात कसा आहे, हे कळेल. उद्धव ठाकरे यांना सध्या पश्चाताप होत असेल. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण कुठे चुकलो, ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. हे वेळीच लक्षात आलं असतं तर एवढी वाईट वेळ आली नसती. मी म्हणालो होतो, रश्मी ताई ठाकरेंना मुख्यमंत्री करा. त्यामुळे जनतेची कामं मार्गी लागली असती. उद्धव ठाकरे अडीच वर्षांमध्ये फक्त चारवेळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले. मंत्री असूनही आम्ही त्यांना कधी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं नाही. तुम्ही काय बघणार, अशी टिप्पणी अब्दुल सत्तार यांनी केली.

शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते गुवाहाटीला

शिंदे गटासोबत भाजपचे दोन नेते मात्र गुवाहाटीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात. यापैकी एक म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरे म्हणजे मोहित कंबोज. शिंदे गटासोबत हे दोन्ही नेते गुवाहाटीला कशाला गेले असावते, यावरुन बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here