बीड : शेतात धुणे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साक्षी ज्ञानोबा कदम (वय १५) असं मृत मुलीचं नाव आहे. या घटनेनं धारूर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विहीर पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास अडथळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेने कदम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कासारी गावावर शोककळा पसरली आहे.