‘कामाख्या देवी खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही’
‘कामाख्या देवीस न्याय देवता असेही म्हटले जाते. ‘बळी’ची लाच दिली म्हणून ती खंजीर खुपश्या लोकांना बळ देणार नाही. कोणतीही देवी किंवा देव गद्दार आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत नाही. त्यामुळे कोप झालाच तर तो मिंधे गटाच्या आमदारांवर होईल. म्हणून धावत पळत हे लोक देवीच्या चरणाशी पोहोचले. मिंधे गटापाशी आज कोणतेही पुण्य उरलेले नाही. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांची अखंड बदनामी सुरू आहे. शिवरायांचा महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहेत. तेव्हा नवस बोलायचा तर तो या महाराष्ट्रद्रोही लोकांना धडा शिकविण्यासाठी बोलायला हवा, पण त्याऐवजी या मंडळींनी नवस केला आहे आणि बळी दिलाय तो आपली सत्ता टिकविण्यासाठी. मग या मंडळींना देवीचा आशीर्वाद कसा मिळणार?’ असा खरमरीत सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिली महाराष्ट्रातील शक्तिपीठांची यादी
महाराष्ट्रात विविध शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी राज्यातील संकटे दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी थेट गुवाहाटीला गेल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे म्हणणं आहे की, कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात की, राज्यावर संकटे आहेत, पण ती दूर करण्यासाठी पंढरपूरची विठोबा माऊली आहे. आई भवानी, तुळजा देवी आहे, मुंबादेवी आहे. महाराष्ट्रात अनेक शक्तिपीठे असताना मुख्यमंत्री आसामातील रहस्यमय व गूढ जागेत जाऊन प्रार्थना करतात हे चित्र आझादीच्या अमृत महोत्सवात कधीच कोणी पाहिले नव्हते,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.