सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये तोंडले गावात ऊसतोड कामासाठी कालिबेल येथून २८ ऑक्टोबरला मनोज चव्हाण, रवी चव्हाण तसेच मुकादम आट्या वन्या वळवी हे मयत ईश्वर सिपा वळवी व गावातील काही मजुरांना मजुरीसाठी घेऊन गेले होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील तोंडले या गावात २० ते २५ लोकांच्या ऐवजी पाच, सहाच मजूर होते. त्यामुळे पाच ते सहा जणांना ऊस कापणे, ऊसाची मोळी बांधणे, ट्रॅक्टर भरणे शक्य नसल्याने ईश्वर वळवी याने अजून काही मजुरांना घेऊन या तेव्हाच काम पूर्ण होतील, असे मुकादम यांच्याकडे मागणी केली होती. परंतु मुकादम याने मागणी पूर्ण न करता तुम्हालाच पूर्ण काम करावे लागेल, असं सांगून जबरदस्तीने ऊस तोड करण्यास सांगितले. मात्र, ऊसतोड न केल्यामुळे आट्या वन्या वळवी, रवी चव्हाण, मनोज चव्हाण यांनी तोंडले येथेच ईश्वर वळवी व इतर मजूरांना मारहाण केल्याचा आरोप मयत ईश्वर वळवीच्या भावाने केला आहे.
या मजुरांना शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ईश्वर हा घरी येत होता. ४ नोव्हेंबरला त्याने त्याच्या वडिलांना कॉल करून सर्व प्रकार सांगितला. ईश्वर घरी येत असताना त्याला रवी चव्हाण, मनोज चव्हाण व आट्या वन्या वळवी यांनी मनमाड येथे बसमधून जबरदस्तीने उतरवून घेतले. तर त्यांच्यापासून माझ्या जीवास धोका आहे मला लवकर घ्यायला या अशा प्रकारचे फोन ईश्वर वळवी यांनी त्यांच्या वडिलांना केला असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
तक्रारीत म्हटलं आहे की, ५ नोव्हेंबरला सकाळी ईश्वर वळवी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी फोन करून सांगितले. त्यानुसार कुटुंबियांनी मनमाड गाठले व तेथून कालिबेल येथे त्याचा मृतदेह आणला. प्रत्यक्ष मृतदेह बघितल्यावर त्याच्या शरीरावर जखमा दिसून आल्याने ही आत्महत्या नसून मारहाण करून, गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे मृत ईश्वर वळवी याच्यावर अंत्यविधी न करता त्याचा मृतदेह मिठात पुरून ठेवण्यात आला आहे.
जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही. शिक्षा न झाल्यास पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे असा आक्रमक पवित्रा तक्रारदार सागर सिपा वळवी व कुटुंबीयाकडून करण्यात येत आहे.
सत्तेतून गेल्यानंतर प्रश्न विचारायलाही हिंमत लागते, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा