आयपीएलसाठी बीसीसीआयने पहिल्यांदा आशिया चषक स्पर्धा रद्द केली. त्यानंतर सर्वांच्या नजरा या आयसीसीवर होत्या. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय आयपीएल खेळवू शकत नव्हती. पण आता विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण बीसीसीआयलाही काही मर्यादा आहेत आणि त्यामध्येच राहून त्यांना आपले काम करावे लागणार आहे.
आयपीएल भरवण्यासाठी बीसीसीआयला काय करावे लागणार
आयपीएलसाठी लागणाऱ्या दोन महिन्यांचा मोठा प्रश्न आता सुटलेला आहे. पण अजूनही बरेच प्रश्न बीसीसीआयला सोडवायचे आहेत. त्यासाठी आता ७-१० दिवसांमध्ये बीसीसीआय एक महत्वाची बैठक बोलावणार आहे. यामध्ये आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे सदस्य असतील. या बैठकीमध्ये आयपीएल कशी खेळवता येईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
याबाबत आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, ” सध्याच्या घडीला आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्ही परिस्थिती कशी असेल, याचा एक अंदाज घेणार आहोत. त्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंत परिस्थिती सुधारलेली पाहायला मिळाली तरच आयपीएल होऊ शकते.”
आयपीएलचे भवितव्य ठरवणार तरी कोण…
आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना काही परवानग्या घ्यावी लागणार आहेत. आयपीएल खेळवायचा निर्णय आता भारत सरकारवर अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे. आयपीएल खेळवण्याची विनंती बीसीसीआय भारत सरकारला करणार आहे. सरकारने विनंती मान्य केली तरच आयपीएल खेळवता येऊ शकते. त्यामुळे आता आयपीएलचे भवितव्य बीसीसीआय नाही तर भारत सरकारवर अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times