India vs Sri Lanka : भारतीय क्रिकेट संघाला (Team India) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी पंजाब संघाच्या जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जितेश शर्माची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे.
बीसीसीआयने ट्वीटद्वारे एक निवेदन जारी करून संजू सॅमसन या मालिकेतून बाहेर असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनला दुखापत झाली होती. संजूच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो संघासह मुंबईहून पुण्यालाही गेला नाही. संजूच्या दुखापतीनंतर टीम इंडियाकडे कोणताही बॅकअप यष्टिरक्षक फलंदाज शिल्लक नसल्याने जितेश शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.” संजू सॅमसनची तपासणी करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने संजू सॅमसनला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्मा टीम इंडियात सामील होणार आहे.
बीसीसीआय ट्वीट
News Reels
NEWS – Sanju Samson ruled out of the remainder of T20I series.
The All-India Senior Selection Committee has named Jitesh Sharma as replacement for Sanju Samson.
More details here – https://t.co/0PMIjvONn6 #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 4, 2023
जितेशची देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी
जितेश शर्माला अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्या चमकदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. जितेश शर्माने या स्पर्धेत अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. जितेशने आपल्या स्ट्राईक रेटने सर्वांना प्रभावित केलं. जितेशने स्पर्धेत 175 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यापूर्वी पंजाब किंग्जकडून 12 सामने खेळताना जितेश शर्माने 29 च्या सरासरीने आणि 162 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. दरम्यान संजू सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर त्याची दुखापत हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत टीम इंडियासाठी संजू सॅमसन हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
कसा आहे भारताचा टी20 संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
हे देखील वाचा-
sports