आयपीएलमध्ये आठ संघ आहेत. प्रत्येक संघात जवळपास ३०-४० खेळाडू असतात. त्याचबरोबर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफही असतो. त्याचबरोबर सामना पाहायला संघाचे मालक आणि त्यांची जवळची मंडळीही येत असतात. त्याचबरोबर पंच आणि अधिकारी असतात. या सर्व गोष्टींकडे पाहिले तर जवळपास एक हजार लोकांची व्यवस्था बीसीसीआयला करावी लागणार आहे. बीसीसीआयपुढे सर्वात मोठी गोष्ट जर कोणती असेल तर या हजार व्यक्तींना सांभाळायचे कसे…
या वर्षी आयपीएल युएईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व लोकांना बीसीसीआयला युएईमध्ये न्यावे लागणार आहे. या सर्वांचा प्रवास सुरक्षित अंतर ठेवून करावा लागणार असल्याने बीसीसीआयला विमान खर्चही वाढणार आहे. त्याचबरोबर या सर्वांची राहण्याची आणि तेथील प्रवासाची सोयही बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामध्ये युएई सरकारच्या नियमांचे पालनही त्यांना करावे लागणार आहे. खेळाडूंसाठी यावेळी कोणती खास व्यवस्था करता येऊ शकते का, याकडेही बीसीसीआय लक्ष देणार असल्याचे समजते आहे. कदाचित खेळाडूंसाठी स्पेशल विमानांची सोयही बीसीसीआय करू शकते, असे म्हटले जात आहे.
सर्वांचा विमान प्रवास ही बीसीसीआयसाठी मोठी अडचण ठरू शकते. कारण जर सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु झाली नाही तर सर्वांना चार्टर्ड विमानांनी युएईमध्ये न्यावे लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयचा खर्च वाढू शकतो. त्यासाठी बीसीसीआयने एक शक्कल लढवली आहे. बीसीसीआय सर्वांच्या विमान प्रवासाचे कंत्राट एकाच एअरलाईन्सला देणार असल्याचे समजते आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एतिहात आणि एमिराट्स या दोन एअरलाईन्सशी संवाद सुरु केला आहे. या दोन्ही कंपन्या सेवा देऊ शकणार का आणि हा सर्व प्रवास कसा करणार, याबाबत बीसीसीआयने त्यांच्याकडून काही गोष्टींची माहिती मागवली आहे. या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरच बीसीसीआय पुढच्या गोष्टी करू शकेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times