करोनाच्या काळतही भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर भारताची धावपटू हिमा दास हीने देशभक्तीचा नजारा पेश करत आपलं हे सुवर्णपदक ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा ही २०१८ साली खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. पण बेहरिनच्या संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे. हिमाने हे सुवर्णपदक आता ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केल्याचे पाहायला मिळत आहे. देशभक्ती कशी असावी, याचा उत्तम नमुना हिमा दासने दाखवला आहे.

याबाबत हिमाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हिमाने सांगितलं की, ” काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. कारण सध्याच्या घडीला पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ‘करोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत. करोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे ‘करोना वॉरियर्स’ पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी ‘करोना वॉरियर्स’ना समर्पित करत आहे.”

याबाबत भारताच्या अॅथलेटीक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, ” आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आता आठ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे. भारताच्या अॅथलेटीक्स पदकांची संख्या आता एकूण २०वर गेली आहे. या सुवर्णपदकाचा नक्कीच भारताच्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयारी करताना फायदा होणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here