आयपीएलसाठी सर्वात मोठे आव्हान हे खेळाडूचे असणार आहे. कारण खेळाडू घराबाहेर पडल्यावर त्याना क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीत निगेटीव्ह आल्यावरच त्यांना युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी जाता येणार आहे. त्यामुळे खेळाडू आपल्या घरातून कधी बाहेर पडणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.
पाच महिन्यांपासून घरात असलेले खेळाडू ८ आणि ९ ऑगस्टला घराबाहेर पडतील, असे समजते आहे. खेळाडू जेवढे लवकर घराबाहेर पडतील तेवढीच पुढील प्रक्रीया सुलभ होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना लवकर घराबाहेर येण्यासाठी बीसीसीआय विनंती करणार आहे. शनिवारी किंवा रविवारी खेळाडू घराबाहेर पडल्यावर ते संघातील खेळाडूंना कुठे आणि कधी भेटणार, याचा कार्यक्रमही ठरवण्यात आला आहे. त्यानुसार आता खऱ्या अर्थाने ‘मिशन आयपीएल’ला सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे.
भारत सरकारने युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलला मान्यता दिली आहे. त्यानंतर बीसीसीआयने पुढचे पाऊल उचलले आहे. सरकारची परवानगी मिळाल्यावर आता खेळाडूंना क्वारंटाइन कसे करायचे आणि त्यांची करोना चाचणी कधी घ्यायची, याचा विचार आणि प्लॅनिंग आता सुरु झाले आहे.
बीसीसीआयला सर्वात जास्त चिंता ही प्रायोजकाबरोबर खेळाडूंचीही आहे. कारण जर एक खेळाडू जरी युएईमध्ये करोना पॉझिटीव्ह सापडला तर आयपीएल रद्द करावी लागू शकते. त्यामुळे बीसीसीआयने युएईला जाण्यापूर्वीच सर्व खेळाडूंना करोना चाचणी करायला सांगितली आहे. या करोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच खेळाडूंना युएईला जायला मिळणार आहे. आयपीएलसाठी युएईला पोहोचल्यावरही खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रत्येक पाच दिवसांनंतर प्रत्येक खेळाडूची युएईमध्ये करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे करोना चाचणी खळाडूंची युएईमध्येही पाठ सोडणार नसल्याचेच पाहायला मिळत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times