२०२२ मधील टी-२० वर्ल्ड कपच्या संघात शुभमन गिलची निवड झाली नव्हती. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी फलंदाजीतील पहिल्या तीन क्रमांकासाठी रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्यावर विश्वास टाकला होता. सध्या स्ट्राइक रेट साजेसा नसल्याने विराट कोहलीवर टीका होते आहे. तशीच टीका गेल्या मोसमात शुभमन गिलवर झाली होती. गिलने यंदा स्ट्राइक रेट उंचावलाच, पण तीन दमदार शतके झळकावत आत्तापर्यंत ८५१ धावाही तडकावत ‘ऑरेंज कॅप’ मिळवली आहे.
गिलच्या ६० चेंडूंतील १२९ धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे गुजरातने दुसऱ्या आयपीएल क्वालिफायरमध्ये मुंबईचा ६२ धावांची फडशा पाडला. ‘गेल्या विंडीज दौऱ्यानंतर (२०२२) मी काही बदल केले. आयपीएलच्या गेल्या मोसमाच्याआधी मी जायबंदी झालो होतो; पण त्या दरम्यानही मी माझ्या खेळातील सुधारणांवर काम करत होतो. मी माझ्याच खेळाचे आकलन केले, काही गोष्टी निश्चित केल्या. त्यानुसार न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान पहिल्यांदा काही तांत्रिक बदल करून पाहिले’, असे गिलने सांगितले.
मुंबईविरुद्धची शतकी खेळी गिलला त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी वाटते. ‘हो कदाचीत, ही माझी सर्वोत्तम कामगिरी असेल. माझ्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत; पण त्याबाबतचा विचार सामन्याला सुरुवात होण्याआधीपर्यंतच असतो. एकदा का मैदानात उतरलो की संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येयच समोर असते’, असे गिल म्हणाला.
‘मी चेंडूगणिक आणि षटकागणिक विचार करतो, तसेच नियोजन करतो. आता मुंबईविरुद्धच्या सामन्यातही एका षटकांत मी तीन षटकार खेचले. तेव्हाच मला कळले होते की, आजचा दिवस माझा आहे. खेळपट्टी पोषक होती, फलंदाजीत मला नवे प्रयोगही करता आले. मात्र यातही आत्मविश्वास सर्वांत महत्त्वाचा होता. आयपीएल सुरू होण्याआधीच्या आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये माझी कामगिरी उजवी झाली होती. त्यामुळे आयपीएलही फळणार याचा अंदाज होताच’, असं शुभमन गिल म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More