मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात राजपूत यांनी वरिष्ठ समितीला धारेवर धरले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘आम्ही सगळेच सचिन तेंडुलकरचा प्रचंड आदर करतो. पण त्याच्या नावाचा विनाकारण सगळीकडे वापर केला जातो. अमूक व्यक्तीची नेमणूक करण्याची शिफारस सचिनने केल्याचे सांगून आमच्यावर दबाव आणला जातो. सचिनला आम्ही चांगले ओळखतो. त्याला काही सूचना करायच्या असतील तर तो अध्यक्षांशी किंवा क्रिकेट सुधारणा समितीशी संपर्क साधून आपले मत व्यक्त करेल.’
राजपूत यांनी एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांना हे पत्र लिहिले असून संघप्रशिक्षक, निवड समिती, फिजिओ, ट्रेनर आदिंच्या नेमणुका सुरू असताना असा दबाव आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यात भारताचा माजी क्रिकेटपटू सलील अंकोलासह मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी, अमित पागनीस, विल्किन मोटा, मुसावीर खोटे, राजेश पवार अशा २४ जणांशी संवाद साधण्यात आला.
राजपूत यांनी या पत्रात नमूद केले आहे की, ‘वरिष्ठ समितीतील एका सदस्याने अध्यक्षांना पत्र पाठवून सुधारणा समितीची बैठक निमंत्रकाने बोलावली पाहिजे आणि गैरसमज टाळले गेले पाहिजेत, अशी मागणी केली होती.’
सीआयसीने निवडलेल्या व्यक्तीची पात्रता एमसीएशी चर्चा करून तपासावी आणि मगच त्यांच्या नावांची घोषणा करावी, अशी मागणी वरिष्ठ समिती सदस्य अमित दाणी यांनी केली होती. सीआयसीच्या बैठकीला निमंत्रक उपस्थित असले पाहिजेत, असेही या पत्रात दाणी यांनी म्हटले होते. त्यावर राजपूत म्हणतात की, ‘असे गैरसमज टाळले गेले पाहिजेत म्हणजे काय? याचा अर्थ काहीतरी गैरसमज झालेले असले पाहिजेत. पण असे कोणतेही गैरसमज नाहीत. मी स्वतः सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांना सीआयसीकडून मुलाखती घेतल्या जाणार आहेत, हे कळविले. या मुलाखतीतून आम्ही संबंधितांची निवड केल्यानंतर निमंत्रकांनी बैठक बोलावली पाहिजे.’
राजपूत लिहितात की, मी एमसीएचा पदाधिकारी म्हणून बराच काळ काम केलेले आहे. स्वतः सचिवही राहिलेलो आहे. त्यामुळे मला कारभाराची चांगली माहिती आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times