भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना सर्वाधिक पाहिला जातो. क्रिकेट विश्वाचे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांवर लक्ष असते. त्यामुळे हे दोन देश कधी आमने-सामने येतात, याची उत्सुकता चाहत्यांना असते. पण आता भारताबरोबर राजकीय मतभेद दूर झाल्यावरच क्रिकेट खेळणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठ वर्षापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यांमध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. या आठ वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण बीसीसीआयने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. भारत सरकारने परवानगी दिल्यावर आम्ही पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळू शकतो, असे बीसीसीआयने म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानला या बीसीसीआयच्या भूमिकेपुढे काहीच करता आले नव्हते.

मणी यांनी यावेळी सांगितले की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळवावी, यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. बीसीसीआयपुढे आम्ही बरेच प्रस्तावही ठेवले होते. पण या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग झाला नाही. जोपर्यंत दोन्ही देशांतील राजकीय मतभेद दूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही भारताशी खेळण्याचा विचार करणार नाही. जेव्हा दोन्ही देशांतील राजकीय संबंध सुधारतील तेव्हाच आम्ही भारताबरोबर क्रिकेट खेळण्याचा विचार करू शकतो. सध्याच्या घडीला भारताबरोबर कोणतीही क्रिकेट मालिका खेळण्याचा विचार आम्ही करत नाही.”

एकेकाळी पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताच्या मागे लागल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. पण आता तर पीसीबीच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे या भूमिकेचा पाकिस्तानला फायदा होणार की फटका बसणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

करोनाचे संकट जेव्हा मार्च महिन्यात भारतात आले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट मालिका खेळावी आणि येणारी रक्कम करोनाच्या उपचारांसाठी वापरावी, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले होते. त्यावेळी शोएबला पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगला पाठिंबा दिला होता. पण त्यावेळी भारताच्या क्रिकेटपटूंनी मात्र शोएबला चांगलेच धारेवर धरले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here