आयपीएलसाठी भारतीय खेळाडू काही दिवसांपूर्वी युएईमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सात दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामध्येच भारतीय खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्या निगेटीव्ह आल्यावरच त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण आता हीच गोष्ट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंच्याबाबत दिसणार नसल्याचे समजते आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंना जर आयपीएल खेळायचे असेल तर त्यांना सहा दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल, असा नियम बनवण्यात आला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय टमालिका सुरु होती, ती नुकतीच संपली आहे. ही मालिका झाल्यावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी युएईला रवाना होणार होते.
आयपीएल खेळण्यासाठी सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी कमी करण्यात यावा, अशी मागणी बीसीसीआयला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंनी केली होती. या मागणीचा विचार करू असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. कारण याबाबतचा निर्णय युएई सरकारला विचारून घेण्यात येणार होता.
पीटीआयच्या एका वृत्तानुसार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंसाठी आता सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी राहणार नाही, तर आता त्यांना ३६ तास क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंसाठी क्वारंटाइनमध्ये राहण्याची मुदत आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ३६ तास क्वारंटाइन राहिल्यावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे. या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्यावर त्यांना आपल्या संघाबरोबर सराव करता येणार आहे.
भारतीय खेळाडूंना आयपीएलसाठी सात दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. पण परदेशी खेळाडूंना फक्त ३६ तासच क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या नियमामुळे भारतीय चाहत्यांमध्ये थोडीशी नाराजी पसरल्याचे दिसत आहे. बीसीसीआय असा दुजाभाव कसा काय करू शकते, असा सवाल चाहत्यांच्या मनामध्ये आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times