दुबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पहिलाच सातमना दणक्यात जिंकला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीला हा सामना जिंकता आला. आरसीबीने हैदराबादपुढे विजायासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चहलने या सामन्यात १८ धावांत तीन बळी मिळवत आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आरसीबीच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादने आपला कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर स्वस्तात गमावला. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टोव्ह आणि मनीष पांडे यांनी हैदराबादच्या संघाच्या डावाला चांगला आकार देण्याचे काम केले. जॉनी आणि मनीष यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली.

जॉनी आणि मनीष ही जोडी आता हैदराबादला विजय मिळवून देईल, असे वाटत असतानाच युजवेंद्र चहलने हैदराबादचा धक्का दिला. हलने मनीषला बाद करत ही जोडी फोडली. मनीषने ३३ धावा केल्या. मनीष बाद झाल्यावर जॉनीने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर जॉनीने अर्धशतकही झळकावले. पण त्यानंतर जॉनीला मोठी खेळी साकारता आली नाही. जॉनीने सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६१ धावा फटकावल्या. चहलने जॉनीलाही बाद करत आरसीबीच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.

हैदराबादने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण त्यांचा हा निर्णय आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पलीक्कडने चुकीचा असल्याचे दाखवून दिले. आपल्याच पहिल्याच सामन्यात देवदत्तने अर्धशतक झळकावत आपली निवड कशी योग्य आहे, हे दाखवून दिले. देवदत्तने पदार्पणाच्या सामन्यात ४२ चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची दमदार खेळी साकारली. त्याला दुसऱ्या टोकाकडून आरोन फिंचनेही चांगली साथ दिली. देवदत्त आणि फिंच या दोघांनी मिळून आरसीबीला ९० धावांची सलामी दिली.

देवदत्त आणि फिंच हे दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाले आणि कर्णधार कोहली मैदानात आला. कोहलीबरोबर आरसीबीचा हुकमी फलंदाज एबी डी व्हिलियर्सही यांनी सावधपणे फलंदाजीला सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त धावा करता आल्या नाहीत. कोहलीला १३ चेंडूं १४ धावाच करता आल्या. कोहलीला नटराजनने रशिद खानकरवी झेलबाद केले. कोहली बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी डी व्हिलियर्सवर आली होती.

डी व्हिलियर्सने स्थिरस्थावर झाल्यावर आपली तुफानी फलंदाजी करायला सुरुवात केली. संदीप शर्माच्या एकाच षटकात दोन षटकार लगावत डी व्हिलियर्सने आपले इरादे स्पष्ट केले आणि त्यानंतर अर्धशतकही पूर्ण केले. डी व्हिलियर्सने ३० चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५१ धावा फटकावल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here