बेंगळुरु: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली. त्याने १३१ धावा केल्या. मालिका विजयासाठी आणि ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखण्यासाठी भारतीय संघाला २८७ धावा कराव्या लागतील. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीला ५० धावांच्या आत बाद केले आणि चांगली सुरूवात करून दिली. पण त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ही जोडी भारतासाठी धोकादायक वाटत असतानाच रविंद्र जडेजाने अर्धशतक झाल्यानंतर लबूशेन याला बाद केले. त्याने ५४ धावा केल्या. त्यापाठोपाठ जडेजाने मिचेल स्टार्कला शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.

वाचा-

त्यानंतर आलेल्या अॅलेक्स केरीने स्मिथ सोबत धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण तो ३५ धावांवर बाद झाला. त्याला कुलदीप यादवने बाद केले. केरीनंतर आलेल्या अॅन्टॉन टर्नर याला सैनीने ४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान स्मिथने वनडे क्रिकेटमधील ९वे शतक पूर्ण केले. शतक झाल्यानंतर स्मिथने धावांचा वेग वाढवला. स्मिथ १३१ धावांवर बाद झाला. शमीने त्याची विकेट घेतली.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावा करेल असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला रोखले. त्यांनी ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या. भारताकडून शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जडेजाने २, तर सैनी आणि यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here