नवी दिल्ली: खेळ कोणताही असो नेहमी त्या खेळातील सर्वोत्तम खेळाडू कोण याची चर्चा केली जाते. क्रिकेटमध्ये देखील सध्या अशीच एक चर्चा सुरू झाली आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज कोण भारतीय संघाचा कर्णधार की ऑस्ट्रेलियाचा फलंदाज यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने स्वत:चे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाने २० जानेवारी रोजी बेंगळुरु येथे भारताविरुद्धच्या सामन्यात स्मिथने १३१ धावांची शतकी खेळी केल्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. स्मिथचे हे गेल्या ३ वर्षातील पहिले शतक ठरले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या पोस्टवर डॅनियल अलेक्झाडर यांनी स्मिथ सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केल्याची प्रतिक्रिया दिली. यावर मायकेल वॉनने विराटच सर्वोत्तम फलंदाज असल्याचे ठामपणे सांगितले.

वाचा-

विराट आणि स्मिथ यांची तुलना होण्याचीही पहिली वेळ नाही. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांने दोन्ही खेळाडूंची तुलना करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते. पण असे सांगत असताना विराटच सर्वोत्तम असल्याचे सांगण्यास तो विसरला नव्हता. तर स्मिथचे कसोटीमधील विक्रम तो किती चांगला फलंदाज आहे हे दाखवून देतात, असे गांगुली म्हणाला होता.

आकडेवारी काय सांगते?

कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास विराटने ८४ सामन्यात ५५च्या सरासरीने ७ हजार २०२ धावा केल्या आहेत. विराटने २०११मध्ये कसोटीत पदारर्पण केले होते. याउलट स्मिथने विराटपेक्षा ११ कसोटी कमी खेळल्या आहेत. ७३ कसोटी सामन्यात स्मिथने ६३च्या सरासरीने ७ हजार २२७ धावा केल्या आहेत. २०१०मध्ये त्याने कसोटी खेळण्यास सुरुवात केली होती. २०१८मधील बॉल टॅपिंग प्रकरणामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

घरच्या मैदानावर स्मिथची सरासरी ७१.१४ तर परदेशात त्याने ६०.१५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराटचा विचार करता त्याने घरच्या मैदानावर ६८.४२ तर परदेशात ४६.१२च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

वनडे क्रिकेटचा विचार केल्यास २००८ मध्ये पदार्पण केलेल्या विराटने २४५ वनडेत जवळपास ६०च्या सरासरीने ११ हजार ७९२ धावा केल्या आहेत. यात ४३ शतकांचा देखील समावेश आहे. सचिन तेंडुलकरचे सर्वाधिक शतकांच्या विक्रमापासून तो फक्त सात शतकाने दूर आहे.

स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून फक्त १२१ वनडे सामने खेळले आहे. ४३च्या सरासरीने स्मिथने ४ हजार ०३९ धावा केल्या असून त्यात ९ शतकांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत स्मिथने २२९ तर विराटने १८३ धावा केल्या होत्या.

टी-२० क्रिकेटचा विचार केल्यास भारताच्या कर्णधाराने ७८ सामन्यात ५२च्या सरासरीने २ हजार ६८९ धावा केल्या. नाबाद ९४ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तर स्मिथने ३६ टी-२० सामन्यात २७.४७च्या सरासरीने ५७७ धावा केल्या आहेत.

आकडेवारीचा विचार केल्यास कसोटीमध्ये स्मिथची कामगिरी उजवी ठरते. तर वनडे आणि टी-२०मध्ये विराट उजवा ठरतो. स्मिथ ३० वर्षाचा आहे तर विराट ३१चा दोन्ही क्रिकेटपटू सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत आणि पुढील काही वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतील. त्यामुळे यापुढे देखील या दोघांपैकी सर्वोत्तम कोण याची चर्चा सुरूच राहिल यात शंका नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here