माउंट माउंगनुई: भारताला आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ५-० असे निर्भेळ यश खुणावते आहे. रविवारी या मालिकेतील पाचवी अन् अखेरची टी-२० लढत रंगणार असून दुणावलेला आत्मविश्वास आणि सूर बघता यजमान न्यूझीलंडपेक्षा सहाजिकच भारतीय संघच विजयासाठी फेव्हरिट समजला जातो आहे. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या दोन संघांमध्ये टी-२० मालिकेतील तीन किंवा पाचही लढती गमावण्याची नामुष्की न्यूझीलंड संघावर केव्हाच आलेली नाही.

वाचा-

विल्यमसनच्या गावात

२००५नंतर त्यांच्यावर ही आफत आलेली नाही. २००८च्या फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडला इंग्लंडकडून ०-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यापेक्षा अधिक लढती त्यांनी एकाच मालिकेत सलग गमावलेल्या नाहीत. ही वेळ त्यांच्यावर भारताने आणली आहे. अर्थात भारतीय संघ निर्भेळ यश मिळवत न्यूझीलंडला त्याच्या घरीच प्रथमच ०-५ असा व्हाइटवॉश देतो का ते बघणे औस्तुक्याचे ठरेल. ही लढत तॉरुंगा येथे होते आहे. जे केन विल्यमसनचे जन्मस्थान आहे. आपल्या कर्णधाराच्या ‘गावात’ यजमान न्यूझीलंडला विजयी लय सापडते का? ते बघायचे.

वाचा-

वर्ल्डकपचा दृष्टिकोन

या मालिकेत निर्भेळ यश लाभले की भारताचे टी-२०मधील जागतिक रँकिंग सुधारेल, अशीही चर्चा आहे; पण भारतीय संघव्यवस्थापन विचार करतो आहे ते टी-२० वर्ल्डकपचा. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी संघबांधणी व्यवस्थित व्हावी, खेळाडूंचा ‘सूर’ लागावा आणि दुखापती संघापासून लांब रहाव्यात याबाबत प्रयत्न सुरू आहेत. संजू सॅमसन आणि शिवम दुबे या नव्या दमाच्या शिलेदारांना टी-२०साठी आणि खास करून टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने तयार केले जाते आहे. संजू सॅमसनला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्यात आली. श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या त्याला संधी दिली गेली; पण हा केरळचा खेळाडू चमक दाखवू शकलेला नाही. संजूने आपल्या फलंदाजीत संयम दाखवणे गरजेचे आहे. शिवमच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर तो पदलालित्यात कच्चा असल्याचे प्रामुख्याने दिसते.

वाचा-

मनीष पांडेने मात्र संघाने दिलेला सहावा क्रमांक गोड मानून घेत सातत्याने कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर पार पडलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून लोकेश राहुल सुसाट कामगिरी करतो आहे. त्याचा फलंदाजीचा क्रमांक बदलण्यात आला; पण तो गडबडला नाही. त्याच्यावर यष्टीरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली; पण तो थकला नाही. यामुळे त्याने कर्णधार विराट कोहलीसह संघव्यवस्थापनाचा विश्वासही संपादन केला आहे. विराटने आता टी-२०सह राहुल वनडेतही यष्टीरक्षण करेल, असे सांगितले आहे. मात्र आता मालिकेत विजयी आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघव्यवस्थापन राहुलला एका लढतीपुरती विश्रांती देत ऋषभ पंतला संधी देण्याची शक्कल लढवू शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. गेल्या टी-२०मध्ये मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली होती.

न्यूझीलंडची डोकेदुखी

न्यूझीलंड संघाबाबत बोलायचे झाले, तर चौथ्या वेलिंग्टन टी-२०ला दुखऱ्या खांद्यामुळे मुकलेला केन विल्यमसन पाचव्या टी-२०मध्ये खेळण्याची शक्यता दाट आहे. न्यूझीलंड संघव्यवस्थापनानेदेखील विल्यमसनच्या उपलब्धतेबाबत आत्मविश्वासाने सांगितले. खरेतर न्यूझीलंड संघासाठी ही डोकेदुखी नाहीच. डावाला यशस्वी फिनिशिंग टच देता न येणे ही न्यूझीलंडसाठी चिंतेची बाब आहे. अन् यासाठी त्याने शारीरिक आणि मानसिक स्तरावरील कामगिरी उंचावणे खूप गरजेचे आहे.

लक्षवेधक१] ही लढत आयोजित होत असलेल्या बे ओव्हल या स्टेडियमवरील गेल्या पाच लढतींमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या आहे ती १९९.
२]डावाच्या अखेरच्या षटकांतील न्यूझीलंडने ३४ टक्के निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवले आहे. तर हेच प्रमाण भारताच्या बाबतीत फक्त २५ टक्के आहे.
३]येथील पाचही लढती प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकल्या आहेत.
४]कॉलिन मन्रोने या बे ओव्हलवर ६१.४०ची सरासरी आणि १९३च्या स्ट्राइक रेटने दोन शतकांसह धावांचा रतीब घातला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here