पोटशेफस्ट्रूम: १९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना या भारताच्या सलामीच्या जोडीने सावध सुरुवात केली. त्यानंतर जम बसल्यानंतर धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दरम्यान या दोन्ही फलंदाजांनी चांगले फटके खेळले. यशस्वी व दिव्यांशच्या जबरदस्त खेळीसमोर पाकिस्तानचे गोलंदाज हतबल झाले. पाकिस्तानच्या गोलंदाजांना निष्प्रभ केल्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी ३ धावांची आवश्यकता असताना यशस्वीने षटकार ठोकून आपले शतक आणि टीम इंडियाचा विजय साकारला. यशस्वीने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तर, दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ५९ धावांची खेळी साकारली. यामध्ये त्याने सहा चौकार लगावले.

उपांत्य फेरीत, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानच्या फलंदाजांना हा निर्णय योग्य सिद्ध करता आला नाही. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाला ५० षटकेही खेळून काढता आली नाहीत. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या संघाला ४३.१ षटकात फक्त १७२ धावांपर्यंत मजल मारता आली.

पाकिस्तानचे फलंदाज ठाराविक अंतराने बाद होत गेले. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद हुरैर याला चार धावांवर बाद करत सुशांत मिश्राने पहिला धक्का दिला. त्यानंतर रवी बिश्नोईने फहाद मुनीरची विकेट घेतली. मुनीर बाद झाला तेव्हा पाकची अवस्था २ बाद ३५ अशी होती. त्यानंतर हैदर अली आणि नाझर यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. पण रवीने हैदरची विकेट घेत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या कासीम ९ धावांवर रनआऊट झाला. मोहम्मद हारिसची विकेट घेत सुशांतने पाकिस्तानला सहावा धक्का दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांना झटपट बाद केले. पाकिस्तानचा संघ ४३.१ षटकात १७२ धावांवर बाद झाला.

वाचा-

वाचा-

भारताच्या सुशांत मिश्राने २८ धावा देत तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन, अर्थव अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून रोहेल नझीर ६२ धावा, हैदर अली ५६ आणि मोहम्मद हॅरीस २१ धावा यांनी भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इतर फलंदांजांनी मात्र झटपट तंबूची वाट पकडली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here