अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवल्यानंतर उत्साहाच्या भरात बांगलादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंशी भिडले होते. विजयानंतर सेलिब्रेशन करताना दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचं रुपांतर धक्काबुक्कीत झाले. मैदानावरील या प्रकरणाची दखल आयसीसीने घेतली आहे.
वाचा-
भारताचा आकाश सिंह आणि रवी बिश्नोई तर बांगलादेशच्या मोहम्मद तौहीद, शमीम हुसैन आणि रकीबुल हसन हे पाच खेळाडू आयसीसीच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरले आहेत.
पाच खेळाडू आणि संघाचे स्टाफ यांना आयसीसीच्या आचार संहितेच्या लेव्हल ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांवर कलम २.२१ तर रवी बिश्नोईवर कलम २.५ नुसार आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व खेळाडू आणि स्टाफनी त्यांची शिक्षा स्विकारल्याचे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
वाचा-
विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी केलेल्या जल्लोषावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर कर्णधार अकबर अलीने माफी देखील मागितली होती. दरम्यान भारताचा कर्णधार प्रियम गर्गने अशा प्रकराची घटना होणे चुकीचे असल्याचे म्हटले.
भारतीय खेळाडू आकाश सिंहने शिक्षा मान्य केली आहे. त्याला आठ निलंबन गुण आणि ६ नकारात्मक गुण दिले गेले आहेत. बिश्नोईला ५ निलंबन गुण तर ५ नकारात्मक गुण दिले आहेत. बिश्नोईला सामन्यातील २५व्या ओव्हरमध्ये दासला बाद केल्यानंतर केलेल्या जल्लोषाबद्दल शिक्षा सुनावली आहे.
बांगलादेशच्या तौहीदला १० निलंबन गुण आणि ६ नकारात्मक, शमीमला आठ निलंबन गुण तर हसनला ५ निलंबन गुण आणि ५ नकारात्मक गुण दिले आहेत. हे नकारात्मक गुण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी देखील लागू होणार आहेत.
एक निलंबन गुण म्हणजे एक वनडे, टी-२० अथवा १९ वर्षाखालील ए संघातून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास बंदी होय.
काय झालं होतं मैदानावर पाहा व्हिडिओ-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times