– वि. वि. करमरकर
साधा सैनिक परमवीर चक्राचा मानकरी होऊ शकेलही; पण त्यानं सरसेनानी पदावर गगनभरारी मारणं अशक्यच. मात्र, असा चमत्कार घडवून दाखवतंय, महाराष्ट्राचं क्रीडाक्षेत्र. शिवप्रभूंच्या नावानं ठेवलेल्या ” या सर्वोच्च पुरस्कारापर्यंत, १८ फेब्रुवारी २०२० या अद्भुत दिवसातील काही तासांत एका अनामिकाला पालखीतून पोचवलं गेलं आहे! धन्य धन्य ते १७ फेब्रुवारी २०२० पर्यंतचे निव्वळ अनामिक ! धन्य धन्य ती पालखी! धन्य धन्य त्या पालखीचे सारे सारे डँबीस भोई!!

ही भरारी मारणारी पालखी वाहणाऱ्या जबरदस्त कंपूने काय काय करामती करून दाखवल्या ते तर बघा. पुरस्कारांच्या नियमावलीला त्यांनी चक्क काही तासांपुरतं कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं! शक्य आहे, की एका लांछनास्पद गौरव समारंभानंतर त्या नियमावलीत पुढच्या वर्षीच्या पुरस्कार निवडीआधीच्या दिवसापर्यंत तिची प्रतिस्थापना पुन्हा देव्हाऱ्यात केली जाईल.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील दीर्घकालीन क्रीडा नैपुण्य, असे खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांची दीर्घकालीन तपश्चर्या, क्रीडासंस्कृती फुलवण्यासाठी दीर्घकालीन क्रीडा वैद्यक, प्रसारमाध्यमे, पारदर्शक व व्हिजनरी प्रशासन अशा काही कामगिरीचा ठसा, तोही काही दशकांचा, अशाच कर्तबगारीचा विचार ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी व्हावा. आर्थिक मदत खेळाडूंना, संस्थांना, संकुलांना, स्पर्धांना इत्यादींना करणे याला फार तर त्या कामगिरीबद्दल दोन-तीन गुण देता येतील.

‘जीवनगौरव’साठी देणगीदार ही भयानक ‘कॅटेगरी’ नवीन व अपूर्णांकाची. तीला पूर्णांक बनवलं, या पालखीवाल्या टोळीनं! या देणगीदारीचा तपशील देण्याचीही आवश्यकता क्रीडामंत्री सुनील केदार यांना वाटलेली नाही. जे काय कोटी, दीड कोटी, पाच कोटी रुपये, पंढरीनाथजींनी कुणाकुणाला, व्यक्तींना, संस्थांना, तालीमींना, आखाड्यांना, सामाजिक संस्थांना, स्पर्धांना आणि ज्याला कुणाला दिले त्याचाही तपशील वेबसाइटवर तातडीने टाका, अशी मागणी वैतागलेले क्रीडा क्षेत्र सुनील केदारांकडे करत आहे.

क्रीडामंत्री केदारजींना माहीत नसेलही; पण गोकुळ वस्ताद तालमीचा लौकिक महाराष्ट्रापासून दिल्ली-पंजाबपर्यंत व भारतीय क्रीडा प्राधिकरणापर्यंत (साई) पसरला तो पैलवान हरिश्चंद्र बिराजदारांमुळेच. बिराजदारांना महाराष्ट्रात गाव-गावची आमंत्रणं. लोक त्यांना हार देत, फेटा बांधत व पाच आकडी बिदागी खुशीनं देत. त्यातून जमलेले काही लाख रुपये बिराजदार यांनी तालमीतील मुलांच्या खुराकावर खर्च केले. पण त्यांची दानत पंढरीनाथजींप्रमाणं एवढ्यापुरती थांबलेली नव्हती. त्यांनी काही दशके खेळाडू घडवले. राष्ट्रीय विजेता काका पवार, आंतरराष्ट्रीय पदक विजेता राहुल आवारे यांचे मूळ प्रशिक्षक बिराजदारच. राष्ट्रीय शिबिरातील उत्तर भारतीय व परदेशी प्रशिक्षक वगळता एकमेव प्रशिक्षकही बिराजदारच. राष्ट्रीय विजेतेपद व आंतरराष्ट्रीय पदके यांचेही मानकरी बिराजदारच. त्यांच्या पंक्तीत पंढरीनाथजींना बसवणे ही करामत कुस्तीप्रेमींना पटणारी नाही; पण पालखीवाल्या कंपूने तिला तूर्त तरी सुनील केदारांची राज्यमान्यता मिळवून दिली आहे. धन्य धन्य पालखीवाले…!

पंढरीनाथजींचा उत्तम उस्ताद, असा उदो उदो (म्हणजे जणू काही सत्पालचे गुरू हनुमानच!) पालखीवाले करीत आहेत. उद्या खाशाबा जाधव, मारुती माने व गणपत आंदळकर यांचेही गुरू त्यांना बनवले जाईल! कोल्हापूरचे श्रीपती खंचनाळे यांच्यापासून राहुल आवारे ते काका पवार यांना त्यांनीच घडविले, हा शोध सर्वस्वी १७-१८ फेब्रुवारी या दोन दिवसांतला. आजपर्यंत खंचनाळे, बिराजदार, काका पवार, राहुल आवारे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतीत कधी पंढरीनाथजींचा उल्लेख केला आहे, तो शोधूनही सापडत नाही. ही गोष्ट सारा महाराष्ट्र नीट जाणून आहे.

प्रशिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करणारी शासकीय नियमावली याबाबत कोणते निकष ठरवते?

सर्वप्रथम तपासले जाते – मूळ प्रशिक्षक कोण? आग्रह धरला जातो सलग तीन वर्षे सातत्याने प्रशिक्षण दिल्याचा. तसेच याबाबतचे हमीपत्र १०० रुपयांच्या बाँड पेपरवर संबंधित गुरू व संबंधित चेले यांच्याकडून घेण्याचा. दस्तुरखुद्द सुनील केदारजी व खास समिती यांनी पंढरीनाथजींची प्रशिक्षण कामगिरी तपशीलवार पाहण्याचे कर्तव्य बजावले का? त्यांनी तपासणी केली असल्यास ती महाराष्ट्रापुढे ठेवावी. केली नसल्यास त्याचे कारण सांगून जबाबदारी स्वीकारावी. कारण छटाकभर कामाचे खंडीभर दाम दिले गेले आहे. त्या घोडचुकीची दुरुस्ती व्हायलाच हवी.

आणखी दोन गोंधळ : कुस्ती प्रशिक्षक बाळासाहेब आवारे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नेमका कशासाठी दिला गेला आहे? बाळासाहेब आवारे यांचेही नाव पंढरीनाथजींच्या प्रमाणे महाराष्ट्राला नव्यानेच कळते आहे. बाळासाहेब हे राहुल आवारेचे पिताजी वा काका वा बंधू वा नातेवाइक आहेत काय? त्यांनी राहुलला घडवले, असा त्यांचा दावा आहे काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असल्यास, एक प्रश्न उद्भवतो. आंतरराष्ट्रीय पदक पटकविल्यानंतर राहुल पुण्यात नतमस्तक झाला तो फक्त हरिश्चंद्र बिराजदारांच्या तसबिरीपुढे. राहुलला ९५ टक्के घडविले, ते बिराजदारांनीच. त्यांच्या दु:खद निधनानंतर उरलेले पाच टक्के काम काका पवारांनी केले (एवढेच नव्हे, तर राहुलला जावई बनवून घेतले). बाळासाहेबांचा दावा कितपत खरा-खोटा याची चौकशी पुरस्कार देण्यापूर्वी होणे उचित ठरेल. हे पुरस्कार महिनाभरासाठी तरी स्थगित करा.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात व आघाडीचे प्रेरणास्थान शरद पवार यांना कळकळीची विनंती : पंढरीनाथ पठारे यांना पालखीवाल्यांनी मिळवून दिलेला पुरस्कार रद्द करा. सरकारी मानपानाचा प्रश्न न करता क्रीडा क्षेत्राच्या इज्जतीला प्राधान्य द्या. तसेच बाळासाहेब आवारे यांना गुरू मानल्याचे सर्टिफिकेट राहुल आवारे यांनी दिले असल्यास व त्यांच्या अर्जात राहुलची कामगिरी दिली गेली असल्यास तोही पुरस्कार रद्द करा. क्रीडा पुरस्कार बाजारात आणले जात आहेत, त्यांची शान टिकवा…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here