इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला रिषभ पंतही आता बऱ्याच वेळा नापास झालेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात पंतला खेळवायचे का, हा प्रश्न आता भारतीय निवड समितीपुढे नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने ट्वेन्टी-२० सामन्यात लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण तो कामचलाऊ यष्टीरक्षक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनीला संधी द्यावी, असे काही माजी क्रिकेटपटूंनाही वाटत आहे.
काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ” धोनीने भारतीय क्रिकेटसाठी भरपूर काही केले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. तो सध्या संघात नाही. पण आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो आपल्याला दिसू शकतो. यासाठी धोनीची आयपीएलमध्ये कशी कामगिरी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.”
शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर धोनीने गंभीरपणे आयपीएलचा सराव करायला सुरुवात केली आहे. धोनीने यावेळी कमाल करत सलग पाच चेंडूंमध्ये षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले आहे.
धोनीने २ मार्चपासून आयपीएलचा सराव करायला सुरुवात केली. यावेळी धोनीबरोबर सुरेश रैना आणि पीयुष चावलादेखील पाहायला मिळाले. आता धोनीने पाच षटकार लगावत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या पाच षटकारांनी धोनीने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. पण धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये नेमका कशी कामगिरी करतो आणि त्याला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times