वाचा-
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी अंतिम फेरीत भारतापुढे आव्हान होते ते तगड्या वेस्ट इंडिजचे. या विश्वचषकापूर्वी त्यांनी सलग दोनदा विश्वविजयांची नोंद केली होती. १९८३ साली वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक होता आणि बऱ्याच जणांना वेस्ट इंडिजचा संघ १९८३ सालीही विश्वचषक जिंकेल असे वाटले होते. पण त्यावेळी सर्वांनाच धक्का देत भारताने हा विश्वचषक जिंकला होता. सध्याच्या घडीला देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
भारताने १९८३ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवले होते. पण या विश्वचषकाच्या पहिल्या साखळी फेरीतही भारताने वेस्ट इंडिजवर मात केली होती. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६० षटकांमध्ये २६२ धावा केल्या होत्या. यावेळी भारताच्या यशपाल शर्मा यांनी सर्वाधिक ८९ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर भारताच्या २६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २२८ धावांत सर्व बाद झाला होता. त्यामुळे पहिल्या आणि अंतिम फेरीत भारताने वेस्ट इंडिजवर मात केली होती.
यंदाच्या महिला विश्वचषकातही असेच काहीसे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या महिल्या संघाने ऑस्ट्रेलियावर पहिल्याच साखळी सामन्यात दमदार विजय मिळवला होता आणि हाच ऑस्ट्रेलियाचा संघ आता भारताविरुद्ध अंतिम फेरीत उभा ठाकला आहे. आता भारताने जर ऑस्ट्रेलियाला रविवारी पराभूत केले तर विश्वविजयाची पुनरावृत्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
सध्याच्या घडीलाही १९८३ साली सारखेच चित्र दिसत आहे. भारताने त्यावेळी ज्या संघाला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते, तोच संघ अंतिम फेरीत पाहायला मिळाला होता. त्याचबरोबर त्यावेळी भारतापुढे वेस्ट इंडिजचा संघ बलाढ्य वाटत होत, असेच चित्र आपल्याला सध्याही पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विश्वविजयाची ही पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times