मुंबई: आयपीएलच्या १३ व्या हंगामा संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या २९ मार्चपासून स्पर्धा सुरू होणार नाही. ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

वाचा-
करोना व्हायरसचा धोका वाढल्याने आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात दबाव वाढला होता. यासंदर्भात केंद्राने देखील यावर्षी स्पर्धा घेऊ नये असा सल्ला दिला होता आणि स्पर्धा घेणार असाल तर त्या रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घ्याव्यात असे सरकारचे म्हणणे होते.

करोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि आयपीएलमधील शेअरहोल्डर्स यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संपर्कात असल्याचे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे.

बीसीसीआयने स्पर्धा पुढे ढकलण्याची घोषणा करण्याआधी दिल्ली सरकारने राज्यातील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यात आयपीएलचा देखील समावेश असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी सांगितले.

हे देखील वाचा-

दरम्यान, बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय घेण्याचा निर्णय घेतला होता. हे दोन्ही सामने चाहत्यांना घरी बसून पाहावे लागतील.

बीसीसीआयने याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २९ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईत होणार होता. पण करोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द होत असताना आयपीएल स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात होती. त्यातच केंद्र सरकारने परदेशी खेळाडूंना १५ एप्रिलपर्यंत व्हिसा देण्यास नकार दिला होता. तर आयपीएल रद्द करावी यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर बीसीसीआयने स्पर्धा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here