पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, यासोबतच अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी होते, हे ध्यानात ठेवा, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी राज्यात आज जमावबंदीचा आदेश मोडणाऱ्या सर्वांनाच फैलावर घेतले. आज अनेक भागांत लोकांनी रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी केल्याचे तसेच वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळेच राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मला घ्यावा लागत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने केले आहे. आकाशने एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आकाश म्हणतो की, ” हा खरोखर चांगला निर्णय आहे. जर लोकं सांगूनही ऐकत नसतील तर त्यांना कोणतेही पर्याय देण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे आता सर्वांनी घरातच राहा.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times