या प्रकरणी १०० हून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभव असलेले प्रसारण संचालक (ब्रॉडकास्ट डायरेक्टर) हेमंत बुच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि सांगितले की, त्यामागेही माणसे काम करतात, त्यामुळे माणसांकडून चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीत डीआरएसच्या प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
हेमंत बुच यांनी संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करताना सांगितले की, ‘बॉल ट्रॅकिंग प्रणाली नेहमीच हॉक-आयद्वारे पुरविली जाते, ज्याला आयसीसीने मान्यता दिली आहे. यासाठी ६ कॅमेरे वापरले जातात. ते प्रसारित करण्यासाठी पाच लोक काम करतात. हे सर्व लोक कॅमेराचा अँगल, चेंडूचे पिचिंग, अल्ट्रा एज इत्यादी गोष्टींवरही नजर ठेवून असतात.
बुच पुढे म्हणाले की, “कंपनीसाठी काम करणारे लोक वेगवेगळ्या क्षमता आणि अनुभव असणारे आहेत. काहीवेळा आपण पाहाल की, ट्रॅकिंग लवकर केले जाते आणि काहीवेळा उशीर होत असतो. प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. ट्रॅकिंग सिस्टीममध्ये मानवी हस्तक्षेपामुळे मानवी चुका होण्याची शक्यता आहे, पण हे कसोटी मालिकेत एक-दोन वेळाच घडते.”
‘हा सर्व डेटा सामन्यानंतर आयसीसीलाही दिला जातो. यामागे बरीच मोठी तपासणी होते. अतिशय काळजीपूर्वक याचे निरीक्षण केले जाते. त्यात काही गडबड झाली, तर तीदेखील पकडली जाऊ शकते, अशी माहितीही बुच यांनी यावेळी दिली.
बुच यांनी माहिती दिल्यावर आता नवीन वाद सुरु होऊ शकतो. कारण जर ट्रॅकिंग सिस्टीममध्ये मानवी हस्तक्षेपामुळे मानवी चुका होत असतील,तर त्याचा वापर का करायला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता यापुढे या तांत्रिक गोष्टींचा वापर खेळात करायचा की नाही, यावर मोठा वाद होऊ शकतो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times