युवराजने आपल्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो विश्वचषक स्वीकारतानाचा आहे. या फोटोमध्ये विश्वचषकासह भारतीय संघ दिसत आहे. या फोटोखाली युवराजने एक कॅप्शन लिहिली आहे.
यावेळी युवराजने २०११ साली झालेल्या विश्वविजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोखाली युवराजने लिहिले आहे की, ” ज्या गोष्टीची आपण सारे वाटत पाहत होतो. जे क्षण अनुभवायला मिळाले ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही…”
वर्ल्ड कप २०११च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २७४ धावा केल्या होत्या. लंकेकडून महेला जयवर्धनेने १०३ धावांची खेळी केली. भारताची सुरुवात फार चांगली झाली नाही. विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. भारताची अवस्था २ बाद ३१ अशी होती. तेव्हा गंभीर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागिदारी केली. विराट २२व्या षटकात बाद झाला. त्यानंतर युवराज सिंगच्या ऐवजी मैदानात आला भारताचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी. त्याने गंभीरसह १०९ धावांची भागिदारी केली. गंभीर ९७ धावांवर बाद झाला.
त्यानंतर धोनीने युवराजसह नाबाद ५४ धावांची भागिदारी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले. युवराजने २४ चेंडूत २१ तर धोनीनी ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ९१ धावा केल्या.
भारतीय क्रिकेट संघाने २८ वर्षानंतर वनडे वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले आणि सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानाची फेरी मारली. काही दिवसांपूर्वी सचिनच्या या फोटोला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षणाचा पुरस्कार मिळाला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times