भारताची धावपटू हिमा दासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत हिमा म्हणाली की, ” पंतप्रधानांनी मला या संवादासाठी आमंत्रण दिले, यासाठी मी त्यांची आभारी आहे. यावेळी मोदी यांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. पण यावेळी मी त्यांच्याकडे एक नाराजीही व्यक्त केली. सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊन काही लोकं पाळताना दिसत नाहीत. उलटपक्षी ही लोकं करोना व्हायरसशी लढणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसतात. हे चित्र नक्कीच वेदनादायी आहे.”
जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपद जिंकणारी हिमा दास तही भारताची पहिली महिला धावपटू ठरली होती. आतापर्यंत या स्पर्धेत भारताच्या एकाही धावपटूला सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. पण हिमाने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. हे सुवर्णपदक पटकावत हिमाने भारताचा तिरंगा फडकावला होता. पण देशाची सेवा करणाऱ्या या खेळाडूंनाही सध्याच्या घडीची चांगलीच जाणीव आहे. त्याचबरोबर सध्या आपल्यासाठी जे चांगले काम करत आहेत, त्यांना सहकार्य करायला हवे, हेदेखील हिमा सांगायला विसरत नाही.
सध्याच्या घडीला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून करोना व्हायरसशी झुंज देत आहेत. काही डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाचा इलाज करताना याच व्याधीने गाठलेही आहे. पण तरीही कुठलीही तमा न बाळगता अन्य डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. पण आपला जीव धोक्यात घालणाऱ्या या लोकांना काही वेळेला अवहेलनेलाही सामोरे जावे लागते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times