श्रीलंका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खरं तर, प्रथम फलंदाजी करणारा संघ या मैदानावर जिंकला आहे, असा इतिहास असताना, श्रीलंकन कर्णधारानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामीची जोडी मैदानात उतरली तीच मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने. रोहित शर्मा आणि इशाननं सावध सुरुवात केली. पण त्यानंतर इशाननं ‘टॉप गिअर’ टाकला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. अवघ्या ३० चेंडूंमध्ये इशाननं आपलं अर्धशतक झळकावलं. तिच लय कायम ठेवत त्यानं ८९ धावा कुटल्या. तत्पूर्वी रोहित शर्मा हा ४४ धावांवर बाद झाला होता. तोपर्यंत सलामी जोडीनं १११ धावा केल्या होत्या. आधी रोहित शर्मा आणि त्यानंतर इशान किशन हा देखील बाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर यानं धुवाधार खेळी केली. त्यानं २८ चेंडूंत ५७ धावा कुटल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. श्रेयसने ५ चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताने २० षटकांत २ बाद १९९ धावा करत, श्रीलंकेसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले.
२०० धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला शून्यावर पहिलाच धक्का बसला. निसांका शून्यावर बाद झाला. त्यानंतर अवघ्या १५ धावा असतानाच मिशाराच्या रुपानं दुसरा धक्का बसला. त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरला नाही. संघाच्या धावफलकावर ६० धावा असतानाच, अर्धा संघ तंबुत परतला होता. असलंकानं शेवटपर्यंत चांगली झुंज दिली. पण ती अपयशी ठरली. त्याने अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
भारतीय फलंदाजांची कामगिरी
रोहित शर्मा – ४४ धावा, ३२ चेंडू, २ चौकार, १ षटकार
इशान किशन – ८९ धावा, ५६ चेंडू, १० चौकार, ३ षटकार
श्रेयस अय्यर – ५७ धावा, २८ चेंडू, ५ चौकार, २ षटकार
रवींद्र जाडेजा – ३ धावा, ४ चेंडू
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times