भारताला २००७च्या टी-२० वर्ल्ड कप फायनल मॅचमध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी करून विजय मिळवून देणारा जोगिंदर शर्माला कोणी विसरणार नाही. देशात करोना व्हायरसचे संकट आले असताना जोगिंदर स्वत:चे कर्तव्य बजावत आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगिंदर हरियाणा पोलिस दलात डीएसएपी पदावर काम करत आहे. जोगिंदर सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पुन्हा घरी जाण्याचे आवाहन करत आहे.
जोगिंदरच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही घेतली होती. आयसीसीने एक ट्विट करत जोगिंदरच्या कामाचे कौतुक केले होते.
याबाबत जोगिंदर म्हणाला की, ” मी हरियाणा पोलिस दलात डीएसएपी पदावर काम करत आहे. त्यामुळे दिवसभर मी लोकांच्या मदतीसाठी धावत असतो. सकाळी आठ वाजता माझा दिवस सुरु होतो आणि रात्रीपर्यंत हे काम सुरुच असते. त्याचबरोबर कधीही एमर्जन्सी येते. त्यामुळे २४ तास जागे राहूनच मला काम करावे लागत आहे. देशाची आणि देशवासियांची सेवा करण्याची हीच वेळ आहे. ”
जोगिंदर शर्माने काही फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले आहेच. या फोटोत तो लोकांना घरी जाण्याचे आवाहन करताना दिसत आहे. स्वत:चा बचाव हाच करोना व्हायरसविरुद्ध आपल्याला वाचवू शकतो. याच्याविरुद्ध आपल्याला एकत्र लढावे लागले. घरी राहून तुम्ही आमची मदत करा, असे हे फोटो शेअर करताना जोगिंदरने म्हटले होते.
जोगिंदरने २००७च्या टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात अखेरची ओव्हर टाकली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या हायव्होल्टेज सामन्यात शर्माने पाकच्या मिस्बाह उल हकला बाद करत भारताला विजय मिळवून दिला होता. भारताला पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारा अशी जोगिंदरची ओळख आहे. क्रिकेट करिअरमध्ये त्याने भारताकडून ४ वनडे, ४ टी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेटमध्ये जोगिंदरची भरीव कामगिरी नसले तरी २००७च्या विजेतेपदाची चर्चा जेव्हा होते तेव्हा जोगिंदरच्या नावाशिवाय ती संपत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times