करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला जगभरात चिंतेचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे जगभरातील काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती नेमकी कधी सुधारेल, हे कोणीही सध्याच्या घडीला सांगू शकत नाही. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. पण याबाबत आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपले मत व्यक्त केले आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अजून काही महिने शिल्लक आहेत. पण तरीही विश्वचषक होणार की नाही, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात प्रश्नचिचन्ह आहे.

ऑस्ट्रेलियाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने सांगितले होते की, आगामी सहा महिने तरी आमची आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद राहणार आहे. जर सहा महिने ऑस्ट्रेलियातील विमान सेवा बंद राहणार असेल तर विश्वचषक होणार तरी कसा, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. कारण विमान सेवा बंद असेल तर अन्य देशांतील खेळाडू आणि चाहते ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचणार तरी कसे, हा कळीचा मुद्दा आहे. काही जणांनी विश्वचषक खेळवायला हवा, अशी भूमिका घेतली आहे. विश्वचषक खेळवण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला नाही तरी चालेल, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण या सर्स प्रकारावर आयसीसीने नेमके काय म्हणते आहे, ते जाणून घेऊया…

याबाबत आयसीसीचे अधिकारी म्हणाले की, ” विश्वचषकाच्या आयोजनाबाबत आम्ही काही योजना बनवल्या होत्या. पण सध्याची परिस्थिती ही बिकट आहे. त्यामुळे आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत आहोत. आम्ही विश्वचषकाच्या योजनेमध्येही बदल करण्यास तयार आहोत. विश्वचषकाला अजूनही सहा महिन्यांच्या अवधी आहे. या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाचे सरकार आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे. सध्याच्या घडीला आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत, त्याचबरोबर तज्ञांचे सल्लेही घेत आहोत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही आमची विस्तृत भूमिका स्पष्ट करू.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here