ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तीनवेळा प्रतिनिधीत्व करणारे माजी तिरंदाजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक लिंबा राम यांची प्रकृती सध्या चांगली नाही. लिंबा राम यांना भारत सरकारने अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. पण सध्याच्या घडीला तरी त्यांच्यावर उपचारांसाठी क्रीडा मंत्रालयाला साकडे घालण्याची वेळ आली आहे.
करोना व्हायरसच्या संकटामुळे भारतामध्ये लॉकडाऊन सुरु आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात माजी दिग्गज खेळाडू लिंबा राम यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यामध्ये अडचण येत आहे. त्यामुळे त्यांना योग्य ते उपचार मिळावेत, अशी विनंती भारताच्या तिरंदाज महासंघाने क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांना केली आहे. कारण सध्याच्या घडीला लिंबा राम यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे ते मोठ्या हॉस्पिटलमध्येही जाऊ शकत नाही. सध्याच्या घडीला त्यांना उपचार मिळत नाहीत, त्यामुळे क्रीडा मंत्र्यांनी त्यांची सोय करणे गरजेचे आहे.
याबाबत तिरंदाजी महासंघाचे महासचिव प्रमोद चांदूरकर यांनी सांगितले की, ” भारताचे अर्जुन आणि पद्मश्री पुरस्कार विजेते लिंबा राम यांच्या पायाला सूज आलेली आहे. सध्याच्या घडीला ते पत्नीसोबत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये राहत आहेत. त्यांना नियमित इंजेक्शन देण्यात येत होते. पण सध्याच्या घडीला लॉकडाऊन असल्या कारणांमुळे डॉक्टर त्यांच्याकडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्याचबरोबर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे कठिण आहे. त्यामुळे क्रीडा मंत्रालयाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्यांना वैद्यकीय उपचार देण्यास मदत करावी. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे लिंबा राम यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांची योग्य ती वैद्यकीय सुविधा पुरवण्याची व्यवस्था क्रीडा मंत्रालयाने करावी, अशी आमची विनंती आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times