सध्याच्या घडीला गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवताना गांगुली यांनी आतापर्यंत चांगले काम केले असून त्यांच्या कामाचे कौतुकही होत आहे. बीसीसीआने करोनाच्या काळात सरकारला मदतही केली आहे. त्याचबरोबर गांगुली यांनी स्वत:हून काही गरजू लोकांच्या अन्न धान्याचा प्रश्नही सोडवला आहे. त्यामुळे गांगुली यांना क्रिकेटची जाण आहेच, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये माणूसकी आहे, असेही म्हटले जात आहे.
वाचा-
सध्या करोनाच्या काळात खेळाडू काही व्हिडीओ कॉन्फरन्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन माजी खेळाडूंनी गांगुली यांनी करोनानंतर जागतिक क्रिकेटची सूत्र हातात घ्यावी, असे म्हटले आहे. कारण गांगुली यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहेच, पण सध्या ते बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवत असल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासनाचाही अनुभव आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ यावेळी म्हणाला की, ” करोनानंतर क्रिकेटला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. ज्या व्यक्तीला आधुनिक खेळही माहिती असायला हवा, त्याचबरोबर प्रशासनाचे कामही त्या व्यक्तीला उत्तमपद्धतीने यायला हवे. सध्याच्या घडीला अशीच एकच व्यक्ती दिसत आहे, ती म्हणजे सौरव गांगुली. करोनानंतर क्रिकेटला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. गांगुली हे काम चांगले करू शकतो, असे मला वाटते.”
वाचा-
इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोव्हर यावेळी म्हणाले की, ” सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटला खेळ आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींचा अनुभव असलेल्या व्यक्तीची गरज आहे. गांगुलीच्या क्रिकेटबाबत आपण न बोललेलेच बरे. कारण तो भारताचा कर्णधार होता. बीसीसीआयचे अध्यक्षपद ही फार मोठी जबाबदारी असते, ही जबाबदारीही गांगुलीने उत्तमरीत्या पेललेली आहे. त्यामुळे यापुढे आयसीसीचे अध्यक्षपद भूषवावे, असे मला वाटते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times