या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ एका दौऱ्यावर जाणार होता. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या दौऱ्याला मान्यताही दिली होती. पण आता भारताला करोनामुळे हा दौरा रद्द करावा लागणार आहे. भारतीय संघ आता कधी मैदानात उतरणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
भारतीय संघ श्रीलंकेमध्ये जाऊन तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय आणि श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळात चर्चा झाली होती. या दोन्ही मालिका जून-जुलै महिन्यांत खेळवण्यात येणार होत्या. सरकारच्या परवानगीनंतर या दोन्ही मालिका कधी खेळवायच्या, हे ठरवण्यात येणार होते. पण बीसीसीआयने हा दौराच रद्द करण्याचे आता ठरवले आहे.
याबाबत बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले की, ” जून आणि जुलै महिन्यात तरी हा दौरा करणे शक्य होईल असे आम्हाला वाटत नाही. याबाबतची माहिती आम्ही श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला दिली आहे. आता हा दौरा पुढे कधी करायचा, याचा विचार आम्हाला करावा लागेल.”
बीसीसीआयने श्रीलंकेचा दौरा रद्द केला आहे. पण जर भारतात आयपीएल होऊ शकली नाही तर ती श्रीलंकेमध्ये खेळण्याचा बीसीसीआय विचार करत होती. जर श्रीलंकेचा दौरा रद्द केला जात असेल तर तिथे आयपीएल खेळवायचे की नाही, याचा विचारही बीसीसीआयला करावा लागणार आहे. दुसरीकडे दौरा रद्द केल्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ मागू शकते. दौरा रद्द होत असेल तर आयपीएल आमच्याकडेच खेळवा, अशी अटही श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ बीसीसीआयपुढे ठेवू शकते. त्यामुळे हा दौरा रद्द करण्याचे काही परीणाम बीसीसीआयला भोगावे लागणार का, हे पाहावे लागेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times